
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Vidyutjiva in Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत आहे. रणबीर कपूर, यश, साई पल्लवी आणि लारा दत्ता यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय याची ‘विद्युतजीव’ या पात्रातील झलकही पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, विद्युतजीव(Vidyutjiva )कोण होता? त्याचा रावणाशी काय संबंध होता? आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये हे पात्र का दाखवण्यात आले नव्हते?
पौराणिक कथांनुसार, विद्युतजीव हा रावणाची बहीण शूर्पणखा हिचा पती होता. त्यामुळे तो रावणाचा मेहुणा मानला जातो. तो कालकेयांचा सेनापती आणि पराक्रमी राक्षस योद्धा होता. शूर्पणखाने रावणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याच्याशी गुप्तपणे विवाह केला होता.
कथेनुसार, रावणाला ही गोष्ट समजल्यानंतर कालकेयांशी झालेल्या युद्धात त्याने विद्युतजीवाचा वध केला. पतीच्या मृत्यूनंतर शूर्पणखा दुःखात बुडाली आणि पुढे वनात प्रभू रामांची भेट झाल्यानंतर रामायणातील पुढील घटनांना सुरुवात झाली. अनेक पौराणिक कथांमध्ये शूर्पणखेच्या माध्यमातूनच रावणाला सीतेच्या सौंदर्याची माहिती मिळाल्याचा उल्लेख आढळतो.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत कथानकाचा केंद्रबिंदू राम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्याभोवती ठेवण्यात आला होता. त्यामुळे शूर्पणखेच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विद्युतजीव या पात्राचा समावेश करण्यात आला नव्हता. मालिकेत थेट शूर्पणखेची राम-लक्ष्मण यांच्याशी झालेली भेट आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांवर भर देण्यात आला होता.
नितेश तिवारी यांच्या ‘रामायणम’मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय विद्युतजीवची भूमिका साकारत आहे.(Vidyutjiva in Ramayana) ट्रेलरमधील त्यांच्या झलकनंतर या पात्राविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात विद्युतजीवच्या माध्यमातून शूर्पणखेच्या आयुष्यातील आणि रामायणातील काही कमी परिचित पैलू उलगडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रेणू धारीवाल यांनी साकारलेली शूर्पणखेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तर नितेश तिवारी यांच्या ‘रामायणम’मध्ये ही भूमिका रकुल प्रीत सिंग साकारत आहे. त्यामुळे दोघींच्या अभिनयाची तुलना होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.