
India Alliance in Front Split : देशभरात भाजप विरोधात विरोधी पक्षांनी एकत्रित भूमिका घेतल्यानंतर आतापर्यंत इंडिया आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने ‘इंडिया’ आघाडीला एकच धक्का बसला आहे. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडलीय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. याबद्दल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने भगवंत मान यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार नाही. राज्यातील १३ जागांवर आम्हाला यश मिळेल.”
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
“माझी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारे चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लोकसभा निवडणूक लढू, असं मी नेहमीच सांगितलं होतं. देशात काय होईल, याची काळजी मी करीत नाही. पण, आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. बंगालमध्ये आम्ही एकटे लढू आणि भाजपाचा पराभव करू,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलं.
“‘भारत जोडो न्याय यात्रे’ची कल्पना देण्यात आली नाही”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पश्चिम बंगालमधून जाणार आहे. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी ‘इंडिया’ आघाडीची एक सदस्य आहे. राहुल गांधींनी न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण, याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही.”