
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले असून, खनौरी सीमेवर पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव कनैल सिंह असून ते 62 वर्षांचे होते. पतियाळा जिल्ह्यातील अरनो येथील रहिवासी असलेले कर्नेल सिंह यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
पतियाळातील राजेंद्र रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आंदोलनातील हा 8 वा मृत्यू आहे. पंजाबातील शेतकरी अद्यापही पंजाब-हरियाणातील शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून बसले असून, मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा 15 वा दिवस होता.
दिल्ली कूच 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले असले तरी शेतकरी संघटनांची बैठक मात्र नियमित सुरू आहे. दिल्ली मार्चसंदर्भात बुधवार 28 फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.