
सातारा : सातारा पालिकेच्या (Satara Municipality) अर्थसंकल्पाकडून शहरासह नव्याने हद्दीत आलेल्या जनतेच्या अपेक्षा यंदा वाढल्या आहेत. या अर्थसंकल्पात वाढीव भागातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी भरघोस निधीची तरतूद करून येथील विकासाची गाडी गतीमान करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
सातारा पालिकेने गेल्या वर्षी ३०७ कोटी ४७ लाखांच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजूरी दिली. कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करून सत्ताधाºयांनी नागरिकांना सुखद धक्का दिला. या अर्थसंकल्पात शहरातील कास तलाव, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, उद्यानांची देखभाल, अजिंक्यतारा विकास व स्मृती उद्यान नुतनीकरण, कर्नल संतोष महाडिक स्मारक, क्रीडांगणांचा विकास तसेच हद्दवाढीत रस्ते, नाले, गटारे, वीज अशा मुलभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. मात्र, हद्दवाढीतील विकासाची गाडी अद्यापही गतीमान झालेली नाही. त्यामुळे हद्दवाढीत आलेल्या दरे, शाहूपुरी, गोडोली, कोडोली, विलासपूर, शाहूनगर, खेड, पिरवाडी या भागातील जनतेच्या अपेक्षा यंदा वाढल्या आहेत.
पालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरसेवकांविना व प्रशासकांच्या अध्यक्षेखाली फेब्रुवारी अखेर सुमारे 345 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार की अपेक्षाभंग करणार? हे पाहणे औस्तुुक्याचे ठरणार आहे.
नागरिकांच्या या आहेत अपेक्षा
– शाहूपुरीसह सर्वच ठिकाणी उत्तम दर्जाचे पथदिवे
– भूमीगत गटार व रस्त्यांचा विकास, पुलांची बांधणी
– आकाशवाणी झोपडपट्टी, मतकर कॉलनी झोपडपट्टी, कातकरी वसाहत यासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र
– खुल्या जागांचा विकास. गाळ्यांची निर्मिती
– सुसज्ज ग्रंथालय, खेळाडूंसाठी क्रीडा संकुल
– ठिकठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छतागृह
– सांस्कृतिक भवनाची निर्मिती, हुतात्मा स्मारकाचा विकास
– स्वतंत्र भाजी मंडई
– शाहूपुरी, त्रिशंकू भागात पालिकेचे उपकेंद्र