
सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यसन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उचबांगडी करण्याचे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जारी केले आहे. गेल्या चार दिवसांत दोन एसीबीच्या कारवाईमुळे सीईओ ऍक्शन मोडवर आले आहेत.
ज्या कर्मचाऱ्याविरोधात अपहाराची तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशा कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्याचे सूचित करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकरणाची फाईल दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही, याची दक्षता घेऊन प्रत्येक कामकाजाचा आढवा घेण्यात यावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील कक्षधिकारी बसवेश्वर स्वामी आणि सामान्य प्रशासनातील कनिष्ठ प्रशासनधिकारी सुहास चेळेकर यांच्यावर लाच प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत असल्याची ओरड सदस्यांमधून होत आहे. विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांनी जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिलीप स्वामी यांनी परिपत्रक जारी केले आहे.