सांगली : जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या खूप गंभीर झाली आहे. सर्व प्रकारचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वत्र पाण्याचा (Water Shortage) ठणठणाट आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक गावांत पाण्याअभावी पिके होरपळली आहेत. चाऱ्याअभावी जनावरे जगवायची कशी, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे.
चार वर्षे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यातच पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने दिलासा मिळाला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र वाढले. यंदा पावसाळ्यात मात्र पुरेसा पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील तलावात सध्या केवळ 14 टक्के पाणी शिल्लक आहे. बहुतेक ठिकाणचा खरीप वाया गेला. रब्बीची पिके वाचविण्यासाठी अडचणी आल्या. पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे.
परिणामी, नद्या, तलाव, विहिरी, कूपनलिका यांमधून पाणी उपसा जोरदार सुरू आहे. पाण्याची मागणी वाढल्याने अनेक तलाव कोरडे पडले आहेत. पाणी योजनांच्या भरवशावर शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्र वाढवले. मात्र, यंदा कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा नाही.
जत तालुक्यात 71 गावांना टँकर
तालुक्यात दुष्काळाची सर्वात जास्त झळ पूर्व भागाला बसत आहे. लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उटगी दोड्डूनाला तलावातून तब्बल ५९ टँकर भरले जात आहेत. यातून ७१ गावे, ५२० वस्त्यांना ८४ टँकरने तहान भागवली जात आहे. मात्र, उटगी दोड्डूनाला या तलावातील पाणी मृतसंचय पातळीवर आली आहे.