
पंढरपूर / नवनाथ खिलारे : गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले होते. परंतु, आज दोन वर्षांनी महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला. यामुळे राज्यातील धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीलाही लागले आहेत. येत्या २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पंढरीनाथाच्या पंढरीमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे.
आषाढी पायी पालखी सोहळ्याचा आयोजित कार्यक्रम…
मंगळवार २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार 22 आणि गुरुवारी 23 पुणे, शुक्रवार 24 आणि शनिवार 25 रोजी सासवड, रविवार 26 जेजुरी, सोमवार 27 वाल्हे, मंगळवार 28 आणि बुधवार 29 रोजी लोणंद, गुरुवार 30 तरडगाव, शुक्रवार 1 आणि शनिवार 2 जुलै रोजी फलटण, रविवार 3 रोजी बरड, सोमवार 4 रोजी नातेपुते, मंगळवार 5 रोजी माळशिरस, बुधवार 6 रोजी वेळापूर, गुरुवार 7 रोजी भंडीशेगाव, शुक्रवार 8 रोजी वाखरी तर शनिवार 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी पालखी सोहळा पोहोचेल. रविवार 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महा सोहळा होणार आहे.
पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदाशिव नगर) , पानीव पाटी, ठाकुरबुवा, बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण सोहळा होणार आहे.