
फोटो सौजन्य - Social Media
कारंजा (लाड) येथे शांतीनगरमध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित समन्वयक विचार मंथन संमेलनात विविध संप्रदायांमध्ये समन्वय असणे ही काळाची गरज असल्याचा एकमुखी सूर व्यक्त करण्यात आला. नाथ, दत्त आणि वारकरी अशा विविध संप्रदायांची उपासना पद्धती, तत्त्वज्ञान आणि विचारधारा भिन्न असली तरी त्यांचा अंतिम उद्देश मानवतेचे कल्याण हाच असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ बेरूळकर गुरुजी होते, तर उद्घाटन पद्मश्री जनार्दन बोथे गुरुजी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नारायण महाराज शिंदे, डॉ. तुकाराम महाराज गरुड, मीराबाई गरुड, विठ्ठलराव कातोळे महाराज, कीर्तनसम्राट लक्ष्मणराव काळे महाराज, नामदेवराव गव्हाळे, अरुणभाऊ सालोडकर आणि संकेत महाराज काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी ‘गुरुपरंपरा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या विषयावर बोलताना डॉ. तुकाराम महाराज गरुड यांनी अध्यात्म क्षेत्रात गुरुपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. गुरूच्या माध्यमातूनच शुद्ध व पवित्र ज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञान व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो, असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात ‘आदर्श समाज जीवन व संत विचारांचे योगदान’ या विषयावर बोलताना कीर्तनसम्राट लक्ष्मणराव काळे महाराज यांनी समाजाला दिशा देण्यासाठी संत आणि कीर्तनकारांचे विचार महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. मात्र, उपदेश करणाऱ्यांनी आपल्या आचार-विचारात पारदर्शकता ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तिसऱ्या सत्रात आचार्य हरिभाऊ बेरूळकर गुरुजी यांनी ‘अध्यात्म आणि समाज जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यात्म आणि धार्मिकता यांतील सूक्ष्म फरक स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, धार्मिकता ही बाह्य स्वरूपावर आधारित असते, तर अध्यात्म माणसाला अंतर्मुख करून त्याच्या आचार-विचारात शुद्धता आणते. अध्यात्म हे केवळ पूजा-अर्चा नसून माणसाला खऱ्या अर्थाने घडवणारे शास्त्र आहे, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी मीराबाई गरुड, नारायण महाराज गव्हाळे, विठ्ठलराव कातोळे, अरुणभाऊ सालोडकर आणि संकेत महाराज काळे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन मनोज चौबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा सेवा अधिकारी सुनील देशमुखे यांनी केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने गुरुदेव प्रेमी उपस्थित होते.