
ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; वसई रोडपासून गोरेगावपर्यंत तांत्रिक बिघाडांची मालिका
पश्चिम रेल्वेवरील वसई रोड स्थानकात पहाटेपासूनच बिघाड झाला होता. पहाटे ४ वाजून ४६ मिनिटांपासून वसई रोड स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या बिघाडाचा परिणाम अप फास्ट लोकल वाहतुकीवर झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पॉइंट क्लॅम्पिंगचे काम हाती घेण्यात आले.
दरम्यान, वसई रोडवरील बिघाडाचे संकट कायम असतानाच दादर स्थानकात सकाळी १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. दादर हे पश्चिम रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे आणि वर्दळीचे स्थानक असल्याने या बिघाडाचा थेट परिणाम लोकल वाहतुकीवर झाला.
यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गोरेगाव स्थानकातील हार्बर मार्गावरही तांत्रिक बिघाड झाला. सकाळी १० वाजून २२ मिनिटांच्या सुमारास पॉइंट क्रमांक १२७/१२८ आणि १२९/१३० मध्ये बिघाड झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला.
Due to technical failures at multiple locations on the #suburban section, train services are currently affected.#localTrain #mumbaiLocal #WesternRailways pic.twitter.com/On4U20lXTQ — Priya Pandey (@priyapandey1999) August 10, 2026
एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक लोकल गाड्या विलंबाने धावू लागल्या. काही गाड्या मार्गातच खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. लोकल गाड्या साधारण १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. सकाळच्या पीक अवरमध्ये लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. वेळेत कार्यालयात पोहोचण्याची घाई असलेल्या नोकरदार प्रवाशांना या विलंबाचा सर्वाधिक फटका बसला.
बिघाडाची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित यंत्रणांची तपासणी करून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरात लवकर लोकल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबईच्या लोकल सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गर्दीच्या वेळेतच लोकल सेवा विस्कळीत होत असल्याने रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.