अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार
कोल्हापूर : कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते. माधुरीने निरोप घेतला त्यादिवशी हत्तीणीसह अखंड कोल्हापूरकरांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा पहायला मिळाल्या. यानंतर हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी आंदोलने केली. बुधवारी वनतारा प्रशासनाच्या टिमने नांदणी मठाच्या महाराजांसह प्रसार माध्यमांशी बोलताना माधुरीला लवकरच नांदणीला परत देणार असल्याचे सांगितले. या निर्णयावरुन राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळच नांदणी परिसरात हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे.
राजू शेट्टींचा वादावर पडदा
आम्ही जैन समाजाचे असून जिओ और जिने दो या तत्वाने जगत असतो. माधुरी हत्तीची काळजी घेत नसल्याचा व तिचा छळ करण्याचा आरोप पेटाने आमच्यावर लावला. हा आरोप आम्हाला सहन नाही झाला. जीव, जंतू आणि जनावर यांच्यावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्रास झाला. यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता शेवट छान होत असून यामध्ये अनंत अंबानींची विशेष भूमिका राहिल्याने राजू शेट्टी यांनी अंबानी परिवाराचे आभार मानले.
माधुरीसाठी सर्व व्यवस्था नांदणी मठात करणार
माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये परत पाठवण्यासंबंधी सर्व ती प्रक्रिया करणार, त्यासाठी अत्यावश्यक सर्व पत्रव्यवहार करणार असल्याचं वनताराचे सीईओ विहान करनी यांनी सांगितलं. वनतारा, सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी सर्व त्या सुविधा निर्माण करण्यात येतील आणि नंतर माधुरीला परत पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.