Raosaheb-Danve gives reason why Why Abdul Sattar doesn't have a second chance
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाल्यानंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुतीमधील अनेक नेते हे नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये जागावाटप, मुख्यमंत्रिपद, पालकमंत्री, खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार अशाच सर्वच बाबींवरुन नाराजीनाट्य रंगले. छगन भुजबश, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार अशा अनेक नेत्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी न दिल्यामुळे नाराजीचा पूर आला. यामध्ये आता अब्दुल सत्तार यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी का देण्यात आली नाही याबाबत रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. याची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने स्वबळाचा नारा दिला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष स्वबळावर लढणार का याबाबत निर्णय झालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे) पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली नाही. सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद का मिळालं नाही? याचं कारण सांगताना रावसाहेब दानवे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘अब्दुल सत्तारांनी आधीच्या मंत्रिपदाच्या काळात केलेल्या भानगडीमुळे मंत्रिपद गेलं’, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, “सिल्लोडमधील प्रत्येक चौकाचं नाव काय आहे हे पाहा. सिल्लोडमधील एकाही चौकात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा जवाहरलाल नेहरु यांचे नाव नाही. नावावरून तर त्या गावची रचना कळती ना? मग त्यांची विचारधारा कोणती? म्हणजे खायचं येथील आणि गायचं कुठलं? मी आजही म्हणतो की पाकिस्तानसारखी परिस्थिती सिल्लोडमध्ये आहे”, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “महापुरुषांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणची जागा बळकावण्याचे काम सिल्लोडमध्ये सुरु आहे. सिल्लोडच्या जिल्हा परिषदेची चार एकरची जागा महापालिकेत घेतली, आता त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर बांधतील, त्यानंतर ते विकून टाकतेन आणि पैसे घेतील. मात्र, तरीही सिल्लोडची जनता गप्प आहे. तसेच अब्दुल सत्तारांचं मंत्रिपद हे त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात केलेल्या भानगडीमुळे गेलं”, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला.