"भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना..."; अनुयायींकडून महामानवाला अभिवादन!
रत्नागिरी/ प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशात अनेक मोठ्या मान्यवरांकडून महामानवाला अभिनवादन केलं जात आहे. दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय मुंबईत येत असतो. मात्र याचपार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि तालुक्यातील गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाअभिवादन करण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. अनुयायी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दाखल झाले होते. मध्यरात्री १२ वाजताच रत्नागिरी तालुक्यातील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, जिल्हा पदाधिकारी विजय जाधव आणि सहकारी प्रदीप जाधव यांच्या हस्ते आधुनिक भारताचे निर्माते, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा नागरिकांनी “वही-पेन आणि शैक्षणिक साहित्य” देऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केले.
आजही लाखो तरुणांचे आयुष्य बदलतात बाबासाहेबांचे ‘हे’ विचार; महामानवाची विचारसरणी
गुरुवारी ५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासूनच गाव-वाड्यामधून अनुयायी रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल होण्यास सुरुवात झाली होती. तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या पुतळ्याजवळ लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री ठीक १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संयुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पंचशील ग्रहण करून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे समता सैनिक दलाचे सैनिक, चळवळीतील कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते पुतळा परिसराच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे हजारो अनुयायी पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळाले.
महापरिनिर्वाण दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची अनोखी मानवंदना !
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास नियोजनानुसार विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धम्म बांधव अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. जवळपास एक ते दोन तास शिस्तबध्द पध्दतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागली होती. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रत्नागिरी येथे दाखल होणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता धम्म बांधवांना दर्शन घेणे सुकर होण्यासाठी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पोलिसांना उत्तम सहकार्य केले.