'मी आज जिवंत आहे ते फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळे'; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला, माझ्या हत्येचाच कट रचला गेला होता. मी आज जिवंत आहे, ते फक्त माझे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे. अन्यथा माझा जीव गेला असता,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा गायकवाड फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले होते. कार्यक्रमस्थळी शिवधर्म प्रतिष्ठान व काही शिवभक्तांनी त्यांच्या अंगावर काळं फासल्यामुळे मोठा गोंधळ झाला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
गायकवाड म्हणाले, “हा हल्ला माझ्यावर नाही, तर संपूर्ण मराठा समाजावर आणि पुरोगामी विचारांवर आहे. मी गेली ३० वर्षे समाजासाठी काम करतो आहे. डॉ. पानसरे, डॉ. दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासारखे विचारवंत या सत्ताकाळात संपवले गेले. आज मी त्याच विचारधारेचा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळेच निशाणा बनलो.”
त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. तरीही कार्यक्रम स्थळी पोलीस बंदोबस्त नव्हता. ही बाब संशयास्पद आहे. पोलीस यंत्रणा मुद्दामहून गैरहजर ठेवण्यात आली का, हा मोठा प्रश्न आहे.”
आपल्या प्रतिक्रियेत गायकवाड यांनी पुढे नमूद केलं की, “मी या घटनेचा निषेध करणार नाही. पण ज्यांनी हे घडवून आणलं, त्यांच्यासाठी ही शेवटाची सुरुवात आहे.” या घटनेनंतर राज्यात विचारस्वातंत्र्य, पुरोगामी चळवळ, आणि सामाजिक सलोखा यावर नव्याने चर्चा सुरु झाली असून, गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत.