राजापूर: कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Project) विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून, आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण केलं जाणार होतं. मात्र स्थानिकांचा विरोध पाहता, सर्वेक्षण पुढे ढकलले असले तरी स्थानिक आंदोलनावर ठाम आहेत. बारसू रिफायनरीवरुन राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बारसूत जालियानवाला हत्याकांड घडण्याची भीती
रत्नागिरीत बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळं येथे वाद पेटण्याची शक्यता आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले की, रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे, आंदोलनावर लोकं ठाम आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आंदोलकांवर दडपशाही सुरु आहे. बारसूतील आंदोलकांना पोलिसांच्या माध्यमातून धमकावलं जातंय, बारसूत जालियानवाला हत्याकांड घडण्याची भीती आहे. आंदोलकांना धमक्या दिल्या जाताहेत. असा आरोप राऊतांनी केला. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत. सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.
विरोधी संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना अटक
दरम्यान, आज कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज देऊनही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज या मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा तापण्याची चिघळण्याची चिन्हे आहेत. कोकणातील बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल (सोमवारी) राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्यासोबत आणखी दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना रत्नागिरीत ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
आंदोलनक आंदोलनावर ठाम…
रिफायनरीला विरोध केल्यामुळे पोलिसांनी काल वैभव कोळवणकर यांना अटक झाल्यानंतर आंदोलकांचे अटकसत्र सुरूच आहे. बारसू आंदोलन स्थळावरून पोलिसांनी प्रसारमाध्यमांना हटवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध पहावयास मिळत आहे.