ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपलं नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करावं. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही !” अशा थेट शब्दांत शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी ‘संभाजी ब्रिगेड’वर सडकून टीका केली.
ठाण्यात टीप टॉप येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून बोलताना काटे यांनी चेतावणीच दिली. “हा विषय केवळ नावाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासपुरते उरले नाहीत, ते आमच्या रक्तात आहेत. त्यांच्या नावाशी छेडछाड सहन केली जाणार नाही.”
शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ‘संभाजी ब्रिगेड’ने वारंवार मागणी करूनही नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केल्याने असंतोष वाढतो आहे. महाराजांचा वारसा आणि शौर्य गगनाला भिडलेलं असताना, ‘संभाजी’ इतक्यावर नाव आडकवणं हे संपूर्ण शिवप्रेमींसाठी अपमानकारक आहे.
दीपक काटे म्हणाले, “नावात सन्मान असतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांचे बलिदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा यामुळे आज आम्ही अभिमानाने मराठा म्हणून उभे आहोत. त्या महापुरुषाचं नाव जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण ‘ब्रिगेड’चे पदाधिकारी याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून बघत असल्याचं दिसतंय.”
या मुद्यावरून समाजात आधीच रोष पसरलेला असून, काही दिवसांपूर्वी सोलापूर मध्ये ‘संभाजी ब्रिगेड’च्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर शंभूभक्तांनी काळं फासलं. या घटनेमुळे विषय आणखी पेटला असून, आता शिवधर्म फाउंडेशनने पुढील आंदोलनाची रणनिती आखण्याचा निर्णय घेतला आहे.
काटे यांनी सांगितलं, “ही चेतावणी समजून घ्या. महाराजांविषयी जराही अपमानकारक उल्लेख झाला, तर शिवधर्म फाउंडेशन शांत बसणार नाही. आमच्या भावना शाबूत आहेत. ‘संभाजी ब्रिगेड’ने अजून वेळ घालवू नये. नाव बदलून इतिहासाची आणि शिवप्रेमींची प्रतिष्ठा राखावी. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर त्याची जबाबदारी त्या संघटनेवरच राहील.”
शिवधर्म फाऊंडेशनची पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे येणार असल्याचे समजताच, संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी काटे यांच्या विरोधात निदर्शन केली. दरम्यान वागळे इस्टेट पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत
कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात बदल करावा यासाठी धर्मादाय आयुक्त आणि निवडणूक आयोगाला लेखी निवेदन शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने लेखी निवेदन दिले जाणार आहे.