
महाआघाडीचा मुहूर्त ठरला
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाची अंतिम वेळ निश्चित झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते शुक्रवारी दिल्लीला जाणार असून, तेथे सर्व वादग्रस्त जागांबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
पक्षाने आपल्या काही उमेदवारांना, ज्यांना 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळणे निश्चित मानले जात आहे, त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. अनेक दिवसांच्या बैठकीनंतर गुरुवारी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) 85-85-85 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. 18 जागांवर मित्रपक्षांचा वाद कायम असला तरी शुक्रवारी या वादावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मुंबईच्या जागांवरून वाद
विदर्भ आणि मुंबईच्या जागांवरून काँग्रेस आणि उद्धव यांच्या सेनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे. पूर्व विदर्भात काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नाही. एकूणच संपूर्ण विदर्भात अशा 12 जागा आहेत, ज्यावर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे तर मुंबईत धारावी, भायखळा आणि वर्सोवा या जागांसाठी चुरस सुरू आहे.
वर्षा गायकवाड यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील धारावी, भायखळा आणि वर्सोवा या जागा कॉग्रेससाठी सोडण्याची गळ त्यांनी ठाकरे यांना घातल्याची माहिती समोर येत आहे.