
'लाठीमारामुळे आंदोलन आणखी मोठं झालं'; जंतर-मंतर आंदोलनावर अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर प्रथमच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. eका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज, त्यानंतरच्या घडामोडी आणि आंदोलनाच्या भूमिकेबाबत आपले मत व्यक्त केले.
दिपके यांनी सांगितले की, पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलन संपेल, आंदोलक घाबरून घरी जातील, असा सरकारचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात त्याचा उलट परिणाम झाला आणि आंदोलनाला देशभरातून अधिक पाठिंबा मिळाला. त्यांच्या मते, 20 जुलैच्या घटनांनंतर विद्यार्थी आंदोलन अधिक व्यापक बनले.
मुलाखतीत त्यांनी असा दावा केला की, आंदोलनकर्त्यांकडे मोठी संख्या होती आणि परिस्थिती वेगळ्या दिशेने नेण्याची क्षमता होती. मात्र, संविधान आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असल्यामुळे कोणताही हिंसक मार्ग स्वीकारण्यात आला नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवर आपली भूमिका आधारित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी
अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतर परिसरात जॅमर लावण्यात आल्याचाही दावा केला. त्यामुळे माध्यमांचे फीड आणि संपर्क व्यवस्था प्रभावित झाली होती, असे ते म्हणाले. आंदोलनातील गर्दीची माहिती बाहेर जाऊ नये आणि समन्वयात अडथळे निर्माण व्हावेत, हा त्यामागील उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याच मुलाखतीत त्यांनी असा आरोपही केला की, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा केवळ गर्दी पांगवण्यासाठी नव्हता, तर भविष्यात सरकारविरोधात आंदोलन करण्याचे धाडस कोणी करू नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न होता.