
सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर (Photo Credit - X)
कसा झाला पराभव
नगरपरिषद नगरपंचायत चा निकाल जाहीर झाला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 12 नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये भाजपाला केवळ चारच नगरपरिषदा आपल्याकडे ठेवता आल्या पंढरपूर सारखी नामवंत नगरपरिषद भाजपाला गमवावी लागली आहे. स्थानिक विकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी बाजी मारलेली दिसत आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट तीन ठिकाणी विजयी झालेले आहेत तर अकलूज आपल्या ताब्यात ठेवण्यात मोहिते पाटलांना यश मिळाले आहे. येथे दहशतीचा मुद्दा राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लावून धरला होता त्याला जनतेने त्यांचा पराभव करून उत्तर दिलेले दिसते आहे.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर भाजपाची सत्ता आणण्यासाठी भाजपाने एक हाती कार्यक्रम राबविले होते. यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पावर दिली पण त्यांनी एकाधिकारशाही दाखवत स्थानिक नेतृत्वांना विश्वासात न घेता आपले निर्णय लादले त्यामुळे भाजपात खदखद निर्माण झाली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एकूणच जिल्ह्यात प्रचार करत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निधी अडवण्याचे कटकारस्थान केले व स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करत स्थानिक नेतृत्वांना नाकारत आपलेच निर्णय त्यांच्यावर लादले त्यामुळे भाजपाला सपशेल अपयश मिळालेले दिसत आहे.
पंढरपूर सारखी महत्त्वाची नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी लक्ष घालून होते. तिथे निर्णय अधिकार माजी आमदार प्रशांत मालक यांनाच मिळायला हवे होते पण तसे न होता पालकमंत्री गोरे यांनीच सर्व सूत्रे हातात घेतल्यामुळे चांगले असणारे वातावरण पूर्णतः बिघडून गेले. आणि हातची नगरपरिषद भाजपाला गमवावे लागले. सांगोला मध्ये देखील महायुतीतील घटक असणाऱ्या शहाजीबापू पाटलांना एकाकी पाडण्याचा प्रयोग पालकमंत्र्यांनी केला त्यामुळे जनता जनार्दनाने पालकमंत्र्याला पराभव करून त्यांची जागा दाखवून दिली. तिथेही भाजपाची सत्ता येऊ शकली असती.
अकलूज मध्ये भाजपाने माजी आमदार राम सातपुते यांना पावर दिली आणि त्यांनी पालकमंत्र्यांना आणून अनेक सभा ठोकल्या आणि त्यातून दहशत गुंडागर्दी असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला त्यालाही जनतेने त्यांचा पराभव करून ठोस उत्तर दिले.सातपुते यांना पावर देऊन निवडणुकीला भाजपा सामोरे गेली खरी पण त्यांची कोणतीच जादू अकलूज मध्ये दिसली नाही भाजपाचे जे चार उमेदवार निवडून आलेले आहेत ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आलेले दिसतात त्यांच्या विजयामध्ये सातपुते यांचा कणभरही वाटा दिसत नाही. त्यामुळे अकलूज नगर परिषद राजकीय नेतृत्व बदलून भाजपाला आपल्या ताब्यात ठेवणे सहज शक्य झाले असते पण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी घोळ केला आणि भाजपाला आपल्या सहजपणे ताब्यात येईल अशी हक्काची असणारी अकलूज नगर परिषद गमवावी लागली. अक्कलकोट ,मैंदर्गी ,बार्शी ,अनगर या ठिकाणी भाजपाची सत्ता आली असली तरी त्यामध्ये पालकमंत्र्याचे योगदान नाही हे स्पष्टपणे दिसते. स्थानिक पातळीवरील नेते मंडळींच्या ताकदीमुळे या नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळलेला दिसतो आहे.
तीर्थक्षेत्र विकास आघाडी, स्थानिक विकासा आघाडी यांना ताकद देण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. त्यामुळे भाजपाची पळता भुई थोडी झाली. पालकमंत्र्याविषयी असंतोषाची लाट होतीच त्यात शरद पवार राष्ट्रवादीने अचूक ताकद देत विजयाला गवसणी घालण्यास मदत केली त्यामुळे मंगळवेढा करमाळा पंढरपूर जिंकण्यात यश मिळाले आणि भाजपाला या नगरपरिषदा गमवाव्या लागल्या.
दुधनी, सांगोला ,मोहोळ यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा चमत्कार पाहायला मिळाला तोही भाजपाच्या असंतोषातूनच…पालकमंत्र्यांच्या ब्लॅकमेलिंग धोरणाला कंटाळलेल्या जनतेने शिंदे गटांच्या पदरात दुधनी,सांगोला, मोहोळ टाकले. कुर्डूवाडी शिवसेना ठाकरे गटाचा विजय देखील भाजपा विषय असणाऱ्या तीव्र भावनेमुळेच साकार झाला.
एकूणच पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले दिसत असून बाहेरील नेतृत्वांना सोलापूर जिल्हा मान्यता देत नसल्याचे चित्र निमित्ताने पुढे आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्र्याची वाढलेली लुडबुड आणि माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सातपुतेंची वाढलेली एकाधिकारशाही लोकांना आवडलेली दिसत नाही त्यामुळेच लोकांनी या बाहेरील नेतृत्वांना फटका करून पुन्हा एकदा जिल्ह्याचा स्वाभिमान दाखवून दिला आहे असेच या निकालाचे वर्णन आहे.