सौजन्य फोटो - सोशल मिडीया
बनावट पासपोर्टच्या आधारे परदेश प्रवासाचा संशय
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नमिराने कथितरीत्या खोटी माहिती देऊन पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. कुर्ला आणि लखनऊ येथील पत्त्यांचा वापर करून मिळवलेल्या पासपोर्टच्या आधारे तिने सौदी अरेबियाला दोन वेळा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवासादरम्यान तिने फरार असलेल्या वडिलांची भेट घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. नमिराने सौदी अरेबियासोबत पाकिस्तानमध्येही प्रवास केला होता का, याचाही तपास केला जात आहे. तिच्या प्रवासाची कागदपत्रे, पासपोर्ट आणि इतर संबंधित माहिती तपासली जात आहे.
मुंब्र्यात काही दिवस वास्तव्यास
तपास यंत्रणा तारीक खानची पत्नी शबनम उर्फ फिर्दोष तारीक खान हिचाही शोध घेत आहेत. शबनम फरार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान नमिरा आणि तिची आई काही दिवस मुंब्रा परिसरात वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर एटीएसने नमिरावर कारवाई करत तिला ताब्यात घेतले. तारीक खानविरुद्ध प्रतिबंधित संघटना सिमी, इंडियन मुजाहिदीन, बनावट नोटा, दहशतवादी कारवाया आणि देशविरोधी कृत्यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे.
कोण आहे तारीक खान?
तारीक खान याचे पूर्ण नाव मोहम्मद तारीक अंजुमन हसन असून तो मूळचा बिहारचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. व्यवसायाने तो सिव्हिल इंजिनिअर असल्याची माहिती आहे. १९९८ पासून तो प्रतिबंधित संघटना ‘सिमी’मध्ये सक्रिय असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. २००३ मध्ये रियाज भटकल आणि इक्बाल भटकल यांच्यासोबत इंडियन मुजाहिदीनच्या स्थापनेत त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. या संघटनेचा संस्थापक सदस्य आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणूनही त्याचे नाव तपासात समोर आले होते. २००७च्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात इंडियन मुजाहिदीनशी संबंधित काही तरुणांना आश्रय आणि मदत पुरवल्याच्या प्रकरणातही तारीक खानचे नाव समोर आले होते. दरम्यान, नमिराच्या अटकेनंतर तिच्या परदेश प्रवासाचा नेमका उद्देश, बनावट पासपोर्टचा वापर आणि फरार वडिलांशी तिचे संबंध याबाबत एटीएसकडून तपास सुरू आहे. तिच्या आईचा शोधही घेतला जात आहे.
सीमी म्हणजे काय?
स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया ही संघटना १९७७ मध्ये अलीगड येथे स्थापन झाली. सुरुवातीला मुस्लिम तरुणांमध्ये धार्मिक आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यावर संघटनेचा भर होता. मात्र, पुढील काळात संघटनेवर कट्टरतावादी विचारसरणी आणि दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप झाले. यानंतर केंद्र सरकारने २००१ मध्ये सीमीवर बंदी घातली. तपास यंत्रणांच्या मते, सीमीशी संबंधित काही माजी सदस्य पुढे इंडियन मुजाहिदीनशी जोडले गेले. मात्र, सीमी आणि इंडियन मुजाहिदीन या स्वतंत्र संघटना आहेत.






