धक्कादायक ! राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; भावासह पुतण्याही गंभीर जखमी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे शेती आणि रस्त्याच्या वापरावरून झालेल्या वादातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे बंधू आणि पुतण्यावर अंदाजे १५ ते २० जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अमेय अजित सावे (वय ३५) यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, त्यांना शहरातील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
तसेच अतुल सावे यांचे सख्खे बंधू अजित मोरेश्वर सावे (वय ७०) यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. अजित सावे यांच्या डोक्यालाही इजा झाली असून, त्यांना आठ टाके पडले आहेत. गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नायगाव-खंडेवाडी परिसरात सावे कुटुंबीयांची जमीन तसेच काँक्रीट प्लांट आहे. या भागातून जाणाऱ्या शेतरस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्याची रुंदी, हद्द आणि त्याच्या वापरावरून सावे कुटुंबीय आणि परिसरातील काही शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गुरुवारी रस्त्याचे काम सुरू असताना हद्दीच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला. त्यावेळी अजित सावे आणि अमेय हे कामगारांसह परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी मोठा जमाव तेथे आला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. जमावातील काही जणांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.
ICU मध्ये उपचार सुरु
सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अजित सावे यांच्या डोक्यालाही मार लागला असून, त्यांना आठ टाके पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी केली. त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मारहाणीमागील नेमके कारण तसेच घटनेची पार्श्वभूमी याचा तपास पोलिस करत असून, रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
मारहाणीचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती
अजित सावे आणि त्यांचा मुलगा अमेय यांना जबर मारहाण करण्यात आल्याचे काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या व्हिडिओच्या आधारेही तपास करण्यात येत असल्याची माहिती बिडकिन पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक निलेश शेळके यांनी दिली.
हल्ल्यामागे अन्य कारणाची चर्चा
सावे कुटुंबीयांचा काँक्रीट प्लांट गेल्या सुमारे दोन वर्षांपासून सुरू असून, या काळात परिसरात मोठा वाद झाल्याची माहिती समोर आलेली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांनंतर अचानक एवढ्या मोठ्या संख्येने जमाव शस्त्रांसह एकत्र येण्यामागे केवळ शेतरस्त्याचा वादच कारणीभूत आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.






