
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Mukesh Khanna on National Anthem: ‘शक्तीमान’ फेम अभिनेता मुकेश खन्ना आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चा आणि वाद निर्माण होतात. आता त्यांनी भारताच्या राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मुकेश खन्ना यांनी केली आहे.
IANSला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी ‘जन गण मन’बाबत आपलं मत मांडलं. त्यांच्या दाव्यानुसार, ‘जन गण मन’ हे भारताचं राष्ट्रगीत नसून ते तत्कालीन ब्रिटिश राजसत्तेच्या सन्मानार्थ लिहिलं गेलं होतं. त्यांनी ‘वंदे मातरम्’ला भारताचं राष्ट्रगीत करण्याची मागणी केली.
मुकेश खन्ना म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो की ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत बनवलं पाहिजे. हे ‘जन गण मन’ आपलं नाही. ते रवींद्रनाथ टागोर यांनी राणी एलिझाबेथ यांच्या काळात त्यांच्या स्तुतीसाठी लिहिलं होतं.”
त्यानंतर त्यांनी ‘वंदे मातरम्’चा उल्लेख करत म्हटलं, “आपलं आहे ‘वंदे मातरम्’, जे लताजींनी गायलं आहे.”
मुकेश खन्ना यांनी आपण ‘वंदे मातरम्’चं एक नवीन व्हर्जन रेकॉर्ड केल्याचाही खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हे गाणं दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं असून त्याची सुमारे सात मिनिटांची आवृत्ती तयार केली आहे.
ते म्हणाले, “मी ‘वंदे मातरम्’ची ७ मिनिटांची आवृत्ती रेकॉर्ड केली आहे, जी एक अजरामर गीत बनेल.”
हे गाणं लवकरच प्रदर्शित करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“जन गण मन काढून त्याजागी वंदे मातरम् आणा”
‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करताना मुकेश खन्ना यांनी थेट ‘जन गण मन’ हटवण्याचीही मागणी केली.
ते म्हणाले, “माझी इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर ‘जन गण मन’ काढून त्या जागी ‘वंदे मातरम्’ आणावं.”
‘वंदे मातरम्’ला प्रोत्साहन मिळत असल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं. शाळा आणि विविध कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, मुकेश खन्ना याआधी कॉमेडियन समय रैना यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. समयच्या शोमधील भाषा आणि आशयावर त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर मुकेश खन्ना आणि समय रैना एका जाहिरातीत एकत्र दिसल्याने सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
आता ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’बाबत केलेल्या मुकेश खन्नांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.