
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Gaurav Khanna Viral Photos: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय स्टंट-आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15′ सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या एका धोकादायक टास्कमुळे शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्पर्धक गौरव खन्ना याने टास्कनंतर आपल्या पाठीवरील जखमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी शोच्या निर्मात्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा दुसरा भाग रविवारी प्रसारित झाला. या भागात गौरव खन्ना, विशाल आदित्य सिंह, करण वाही आणि शगुन शर्मा यांना पाठीवर रबर बुलेट्सचा मारा सहन करत शक्य तितक्या वेळ स्थिर उभे राहण्याचे आव्हान देण्यात आले होते. सर्वाधिक वेळ वेदना सहन करणारा स्पर्धक विजेता ठरणार होता, तर आधी हार मानणारा स्पर्धक पराभूत होणार होता.(Gaurav Khanna Viral Photos)
या टास्कमध्ये गौरव खन्ना आणि शगुन शर्मा यांनी सर्वाधिक वेळ टिकून राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीव्र वेदनांमुळे दोघांनाही अखेर टास्क अर्धवट सोडावा लागला. एपिसोडनंतर गौरवने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या पाठीवरील जखमांचा व्हिडिओ शेअर करत हा अनुभव आयुष्यातील सर्वात वेदनादायी असल्याचे सांगितले.
त्याने पोस्टमध्ये लिहिले, “टीव्हीवर हा टास्क पाहतानाही त्या वेदना पुन्हा जाणवत आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभव होता. आम्ही चौघांनीही हा त्रास सहन केला आणि माझ्या पाठीवर अजूनही त्या जखमांच्या खुणा आहेत.”
फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप
गौरवच्या पाठीवरील स्पष्ट जखमा पाहून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या टास्कवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याची तुलना दिल्लीतील अलीकडील NEET आंदोलनादरम्यान कथितरित्या वापरण्यात आलेल्या पेलेट गनशी केली. काही युझर्सनी हा स्टंट “मनोरंजन नव्हे, तर छळ” असल्याची टीका केली.
मात्र, एपिसोडदरम्यान रोहित शेट्टी यांनी स्पष्ट केले की स्पर्धकांवर पेलेट गन नव्हे, तर रबर बुलेट्स वापरण्यात आल्या होत्या.
This is torture, not a task. #KKK15 #Khatronkekhiladi15 pic.twitter.com/7rSoeBpIfn — Anshika Singh (@AbXBajaj) August 3, 2026
आरोग्यविषयक संकेतस्थळ Healthlineच्या माहितीनुसार, रबर बुलेट्स या काइनेटिक इम्पॅक्ट प्रोजेक्टाइल्स (KIPs) या श्रेणीत मोडतात. या गोळ्यांचा वापर प्रामुख्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा जमाव नियंत्रणासाठी करतात. त्यांना प्राणघातक नसलेले शस्त्र मानले जात असले, तरी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते त्यांच्यामुळे गंभीर दुखापत, कायमचे अपंगत्व आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, ‘खतरों के खिलाडी 15’मधील हा स्टंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, मनोरंजनासाठी अशा प्रकारचे धोकादायक टास्क आवश्यक आहेत का, असा प्रश्न अनेक प्रेक्षक उपस्थित करत आहेत.