
फोटो सौजन्य - Social Media
मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या Inspector Manju ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. हेलिकॉप्टरमधून हिरोसारखी एन्ट्री आणि त्यानंतरचा स्फोट – या थरारक दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. मालिकेच्या कथानकाने आता अत्यंत रंजक वळण घेतले असून पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
कथानकात सत्या आणि मंजू यांच्यातील नातं पुन्हा एकदा घट्ट झाल्याचं दिसत आहे. अनेक गैरसमजांनंतर हे दोघे पुन्हा एकत्र आले असून त्यांच्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. मात्र, त्यांना वेगळं करण्यासाठी आर्यन सतत नवे डाव आखताना दिसतो. तरीही सत्या–मंजूचं नातं प्रत्येक संकटावर मात करतं, हे आतापर्यंतच्या भागांतून स्पष्ट झालं आहे. नव्या प्रोमोमध्ये सत्या पक्षाच्या कामासाठी दिल्लीला जाण्याची तयारी करताना दिसतो. मम्मीसाहेब आजारी असल्यामुळे ही जबाबदारी त्याच्यावर येते. मंजू त्याला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते, पण पक्षाकडून आलेल्या आदेशामुळे सत्या निघण्याचा निर्णय घेतो. यानंतरच प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो – सत्या ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत असतो, त्याचा स्फोट होतो.
हा स्फोट अपघात आहे की कुणाचा कट, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्या सुरक्षित आहे का? की हा प्रसंग सत्या–मंजूच्या नात्यात पुन्हा दुरावा निर्माण करणार आहे? या सर्व प्रश्नांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून “सत्या–मंजू कधीही वेगळे होऊ शकत नाहीत,” असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. सत्या ही भूमिका साकारणारा Vaibhav Kadam यानेही या प्रोमोबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात मेसेज येत आहेत. ‘तुझा खरंच अपघात होणार आहे का?’ किंवा ‘तुझी मालिकेतून एक्झिट होणार का?’ असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट असणार आहे.”
त्याने पुढे सांगितले की, हेलिकॉप्टरचा सीन शूट करण्यासाठी संपूर्ण टीम साताऱ्याहून पुण्याला गेली होती आणि अवघ्या एका तासात हा सीन पूर्ण करण्यात आला. “चित्रपटांमध्ये हिरोला हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करताना पाहिलं होतं, पण माझ्या आयुष्यातही असा क्षण येईल, असं कधी वाटलं नव्हतं. तो अनुभव खूप खास होता,” असंही त्याने सांगितलं. आता या मालिकेत पुढे काय घडणार, सत्या खरोखरच संकटात सापडला आहे का, आणि मंजूच्या आयुष्यात कोणता नवा वळण येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता Sun Marathi वर हा विशेष भाग पाहावा लागणार आहे.