
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ram Kapoor: अभिनेता राम कपूरने ‘लॉकअप २’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टरांनी आपल्याला सहा महिन्यांत मृत्यू होऊ शकतो, असा इशारा दिला होता. मात्र, ही गोष्ट त्यांनी पत्नी गौतमी कपूरलाही सांगितली नव्हती, असे राम कपूर यांनी सांगितले.
‘लॉकअप २’मध्ये राम कपूर म्हणाले, “मी अनेक वर्षे एक मोठं रहस्य जगापासून लपवून ठेवलं होतं. माझ्या पत्नीला देखील याबद्दल माहिती नव्हती. एका टीव्ही शोच्या काळात मी आयुष्यातील सर्वात वाईट नैराश्याचा सामना करत होतो.”
ते पुढे म्हणाले, “डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की माझी प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि सहा महिन्यांत माझा मृत्यू होऊ शकतो. मी दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घेत होतो. माझी साखरेची पातळी ४०० ते ६०० दरम्यान असायची आणि तरीही मी दिवसाचे १४ तास काम करत होतो.”
राम कपूर यांनी सांगितले की, त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्यांना छोट्या पडद्यावर मोठी लोकप्रियता मिळाली. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. “लोकांचं प्रेम आणि यश मिळत असल्याने मी माझ्या लठ्ठपणाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही. पण त्यामुळे मी स्वतःलाच हरवत होतो,” असेही ते म्हणाले.
राम कपूर यांनी सांगितले की, त्यांच्या मुलांमुळेच त्यांनी आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला.
“जर माझी मुलं नसती, तर मी कदाचित नैराश्यात पूर्णपणे बुडालो असतो. मुलांसाठीच मी स्वतःवर काम केलं. आज मी जिवंत आहे, त्याचं सर्वात मोठं कारण माझी मुलं आहेत,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
यापूर्वीही ‘लॉकअप २’मध्ये राम कपूर यांनी आपल्या वडिलांबाबत मोठा खुलासा केला होता. कर्करोगाने त्रस्त असलेल्या वडिलांनी पुढील उपचार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचा आपण आदर केला आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, असे राम कपूर यांनी सांगितले.