
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ramayana: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कलाकारांच्या भूमिकांची जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरमध्ये राजा दशरथ यांच्या भूमिकेत अरुण गोविल दिसत आहेत. मात्र, या भूमिकेसाठी अरुण गोविल हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. हा खुलासा ज्येष्ठ मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी केला आहे.
एका मुलाखतीत अजिंक्य देव (ajinkya deo)यांनी सांगितले की, त्यांनी सुरुवातीला राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि निर्मात्यांकडून त्यांना हीच भूमिका मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.
अजिंक्य देव म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी मी राजा दशरथच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मला सांगण्यात आले होते की ही भूमिका मी साकारणार आहे. मात्र, चित्रपटाचे काम पुढे सरकत असताना अरुण गोविल यांची या भूमिकेसाठी निवड झाली. त्यांना ही भूमिका मिळाल्याचा मला आनंद आहे.”
राजा दशरथची भूमिका न मिळाल्याची कोणतीही खंत नसल्याचे अजिंक्य देव यांनी स्पष्ट केले. उलट त्यांना चित्रपटात महर्षी विश्वामित्र यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
“विश्वामित्राची भूमिका मला ऑफर झाली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. या पात्राचे महत्त्व मला चांगले माहीत आहे,” असे अजिंक्य देव म्हणाले.
दरम्यान, ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचवेळी अरुण गोविल यांनीही एक रंजक खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, ‘रामायण’ मालिकेत प्रभू रामाच्या भूमिकेसाठीही ते सुरुवातीला पहिली पसंती नव्हते. त्यांनी दुसऱ्या एका भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मात्र, नशिबाने त्यांना राजा दशरथ भूमिका मिळाली आणि तीच त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय भूमिका ठरली.
आता नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात अरुण गोविल प्रभू रामाचे वडील राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अजिंक्य देव महर्षी विश्वामित्र यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.