Delhi Assembly Elections: "ते आणि त्यांचे मंत्री यमुनेत जाऊन..."; केजरीवालांविरुद्ध गरजले CM योगी आदित्यनाथ
नवी दिल्ली: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दिल्लीमध्ये तिरंगी लढत होणार असून सर्व देशभरातून निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपने अनेक स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील दिल्लीच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. त्यांनी एका प्रचार रॅलीला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
दिल्ली निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे प्रचाराच्या तोफा जोरात आग ओकू लागल्या आहेत. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीच्या कराडी मतदारसंघात सभा घेतली. या सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
“काल आपण पाहिले आहे की, माझ्याबरोबर 54 मंत्र्यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये स्नान केले. एक मुख्यमंत्री म्हणून मी आणि माझे मंत्री प्रयागराज संगम येथे डुबकी लगावू शकतात. तो आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मंत्री यमुनेत जाऊन डुबकी लगावू शकतात का? “, असा सवाल
आपल्या सभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी विचारला.
योगी आदित्यनाथ पुढे बोलताना म्हणाले, “दिल्लीच्या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत? यांना विकास करायचाच नाहीये. सकाळी उठून प्रेस घ्यायची आणि लोकांची दिशाभूल करायची. घुसखोरांना आप सरकार आधार कार्ड वाटत आहे. दिल्लीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. यमुना नदीच्या स्थितीचा फटका मथुरा आणि वृंदावनच्या नागरिकांना बसत आहे. यमुनेची स्थिती बिकट आहे.
हेही वाचा: Delhi Assembly Elections: अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका; म्हणाले, “कमळाचे बटण दाबले की घरी…”
अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका
अरविंद केजरीवाल म्हणाले, “देशातील 20 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तरी त्या कोणत्याच राज्यात 24 तास वीजपुरवठा केला जात नाही. निवडणुकीत तुम्ही चुकीचे बटण दाबले, तर दिल्लीत पुनः 6 तास वीजपुरवठा खंडित केला जाईल. तुम्ही कमळाचे बटण दाबले की तुम्ही घरी पोहोचेपर्यंत वीजपुरवठा खंडित होईल. गेल्या 10 वर्षांत दिल्लीसाठी काय केले हे ते कधीच सांगत नाहीत. केवळ माझ्यावर टीका करतात आणि मला वाईटसाईट बोलतात.”
भाजपकडून जाहीरनामा -2 प्रसिद्ध
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिल्लीच्या नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपने आपल्या जाहिरनाम्यातून केजी ते पिजी पर्यंत मोफत शिक्षण, तसेच ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबद्दल सांगण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपच दिल्लीत सरकार स्थापन करेल असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दिल्लीतील तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. याशिवाय अनेक वचने भाजपने आपल्या जाहीरनामा 2 मध्ये दिल्लीच्या नागरिकांना दिली आहेत.