
दिल्ली : देशातील लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या व सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरामध्ये निकालाबाबत उत्सुकता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का याकडे जगभरातून लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानामध्ये नरेंद्र मोदी यांची उमेदवार असलेला वाराणसी हा देखील मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे भवितव्य आज कुलूपबंद होणार आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवर देशवासियांना पत्र लिहिले आहे.
राहुल गांधी यांचे पत्र
राहुल गांधी यांनी देशवासियांसाठी खास संदेश या पत्राद्वारे दिला आहे. तसेच इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, प्रिय देशवासियांनो! आज मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा असून आत्तापर्यंतच्या ट्रेंडवरून भारतात सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मला अभिमान आहे की, कडक उन्हातही लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही सर्वजण मतदानासाठी बाहेर पडलात. आजही मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि दंभ आणि अत्याचाराचे प्रतिक बनलेल्या या सरकारच्या विरोधात मताने ‘अंतिम धक्का’ द्या. 4 जूनचा सूर्य देशात नवी पहाट घेऊन येणार आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
प्यारे देशवासियों! आज सातवें और अंतिम चरण का मतदान है और अब तक के रुझानों से स्पष्ट है कि देश में INDIA की सरकार बनने जा रही है। मुझे गर्व है कि झुलसा देने वाली गर्मी में भी आप सभी लोकतंत्र और संविधान की रक्षा के लिए वोट देने निकले हैं। आज भी बड़ी संख्या में बाहर निकल कर… — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 1, 2024
जे.पी.नड्डा यांचे आवाहन
त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी देखील मतदारांना आवाहन करत शेवटच्या टप्प्यापूर्वी ट्वीटर पोस्ट केली आहे. जे. पी. नड्डा यांनी लिहिले आहे की, मी लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना, विशेषतः माता, भगिनी आणि तरुणांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. तुमचे प्रत्येक मत एक मजबूत, समृद्ध आणि स्वावलंबी राष्ट्र निर्माण करण्याचा आमचा संकल्प मजबूत करेल आणि ‘विकसित भारताच्या उभारणी’च्या मार्गावर आम्हाला अधिक वेग देईल. यामुळे देशाच्या अविश्वसनीय वारशाचा पुनर्विकास आणि लोकांचे सर्वांगीण उन्नती सुनिश्चित होईल. लोकशाहीप्रती आपली सर्वोच्च जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडा, नक्कीच मतदान करा.