देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
Manmohan Singh Death News: Live Updates : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज निधन झालं. ते ९२ वर्षांच्या होते. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आज त्यांची प्रकृती खालावल्याने तातडीन एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांची तपासणी करतं होतं. दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांना अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब प्रांतातील एका गावात झाला. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली आहे. डॉ.मनमोहन सिंग यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून (यूके) अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल पदवी मिळवली. त्यांना शिक्षणात आवड असल्यामुळे त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापनाचं कामही केलं.
1971 मध्ये डॉ. सिंग भारत सरकारमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.
1991 ते 1996 या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक सुधारणांचे व्यापक धोरण राबवलं. त्यांच्या या धोरणाचं जगभरात कौतुक झालं. या सुधारणांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढलं आणि नवी दिशा दिली. डॉ. मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांनी पाच वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले. 1998 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी डॉ. त्यांनी 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना यश आले नाही.
2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, 22 मे रोजी त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले. 2009 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि 2014 पर्यंत ते या पदावर राहिले.