
'महाराष्ट्राला 3 वर्षांत 520 कोटींचा निधी'; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली : देशातील एकूण मृत्यूंपैकी ६१.८ टक्के मृत्यू आता असंसर्गजन्य रोगांमुळे होतात. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या अहवालानुसार २८.१ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे, १०.९ टक्के दीर्घकालीन श्वसन रोगांमुळे, ८.३ टक्के कर्करोगामुळे आणि ६.५ टक्के मधुमेह, मूत्रजनन, रक्त आणि अंतःस्त्रावी ग्रंथींच्या रोगांमुळे होतात, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत दिली.
काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. २०२३-२४ ते २०२५ २६ या आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्राला – असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वाधिक निधी मिळाला आहे. महाराष्ट्राला २०२३-२४ मध्ये ५१.४७ कोटी रुपये, २०२४-२५ मध्ये २२६.१४ कोटी रुपये आणि २०२५-२६ मध्ये २३२.०७ कोटी रुपये मिळाले. अशाप्रकारे, महाराष्ट्राला तीन वर्षांत एकूण ५१९.६९ कोटी रुपये मिळाले. उत्तर प्रदेशला ६९९.७५ कोटी रुपये आणि राजस्थानला ५०५.०२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रात सर्वात जलद वार्षिक वाढ दिसून आली, असे जाधव म्हणाले.
खासदार वासनिक यांनी सरकारला प्रश्न विचारले होते. या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देत आहे. हा कार्यक्रम पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, मनुष्यबळ विकास, तपासणी, लवकर निदान, संदर्भ सेवा, उपचार आणि आरोग्य संवर्धन यावर लक्ष केंद्रित करतो.
6410 आरोग्य केंद्रांची स्थापना
आजपर्यंत, देशभरातील ६४१० सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये ७७० असंसर्गजन्य रोग क्लिनिक, २३३ हृदयरोग काळजी युनिट्स आणि असंसर्गजन्य रोग क्लिनिक स्थापन करण्यात आले आहेत.
‘लाठीमारामुळे आंदोलन आणखी मोठं झालं’; अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर प्रथमच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज, त्यानंतरच्या घडामोडी आणि आंदोलनाच्या भूमिकेबाबत आपले मत व्यक्त केले.