
दिल्ली : आज देशभरासह संपूर्ण जगाचे लक्ष नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांच्या गळामध्ये मंत्रीपदाची माळ पडते याची उत्सुकता सर्वांना लागली असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहेत. अजित पवार यांच्या गटाला नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये एकही जागा मिळालेली नाही.
अजित पवार गटासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि भविष्य ठरवणारी होती. यामध्ये अजित पवार गटाला राज्यामध्ये चार जागांपैकी केवळ एका जागेवर यश मिळाले. बारामतीचा गड देखील अजित पवार यांना जिंकता आलेला नाही. याचा परिणाम म्हणून अजित पवार गटाला केंद्रामध्ये एकही जागा न मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रामध्ये दोन मंत्रीपदं मिळावी अशी आधी अजित पवार गटाने मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांची केवळ एक जागा अजित पवार गटाला मिळाली. तसेच राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल असे एक राज्यसभा खासदार अजित पवारांकडे आहे. एका जागेची तरी अपेक्षा असताना अजित पवार गटाला एक देखील मंत्रिपद देण्यात आलेले नाही. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली भेट
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळामध्ये अजित पवार गटाला एकही जागा न दिल्यामुळे मोठा धक्का बसला. यानंतर दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. अजित पवार गटाची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या घरी धाव घेतली. तसेच प्रफुल्ल पटेल देखील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी माध्यमांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारल्यावर “आत्तापर्यंत मला कोणताही निरोप आलेला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याभेटीनंतर भाजपकडून राष्ट्रवादीची समजूत काढण्यात येत आहे.