shahbaj sharif( फोटो सौजन्य : social media)
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. यात 26 पर्यटकांचा जीव गेला होता. यानंतर भारताने अनेक निर्णय घेतले. मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सैनिक पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केली. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे.पाकिस्तानात 100 km आत घुसून हा ऑपरेशन एअर स्ट्राइक करण्यात आली. भारतीय हवाई दलातील पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले नऊ तळांवर हवाई हल्ले केले. नऊ टारगेट ठेवण्यात आले होते. नऊच्या नऊ टार्गेट यशस्वी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना अत्यंत कठोर विधान केलं. भारताला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी त्यांनी दिली आहे. “काल रात्री केलेल्या चुकीची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल”.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिला धमकी
भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे, तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पंतप्रधान शरीफ यांनी दिली. त्यांनी मृतांचा उल्लेख ‘शहीद’ असा करत संपूर्ण पाकिस्तान त्या शहिदांसोबत उभा असल्याचं म्हटलं. “भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल. आम्ही काल रात्री सिद्ध केलं की पाकिस्तानला कडक उत्तर कसं द्यायचं हे माहीत आहे.” या भाषणाच्या अखेरीस त्यांनी पाकिस्तानी सैन्याला सलाम केला आणि सांगितलं की संपूर्ण देशाला त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अभिमान आहे.
काय म्हणले पंतप्रधान शाहबाज शरीफ?
बुधवारी सकाळी शाहबाज शरीफ यांनी संसदेत संबोधित करताना भारताच्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. “काल रात्री घडलेल्या घटनेबद्दल क्षणाक्षणाचे अपडेट्स मला मिळत होते. काल रात्री भारताने संपूर्ण तयारीनिशी 80 फायटर जेट्ससह पाकिस्तानमधील सहा जागांवर हल्ले केले. शत्रूने अंधाऱ्या रात्री आमच्यावर हल्ला केला. परंतु अल्लाहच्या कृपेने आमचं सैन्य त्यांना चोख उत्तर देऊ शकलं. या हल्ल्यात अनेक नागरिकांसह लहान मुलांचा मृत्यू झाला. अल्लाह त्यांना स्वर्गात जागा देवो. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर भारताने घाईघाईने कारवाई केली. भारतीय माध्यमांनी पाकिस्तानवर निराधार आरोप करायला सुरुवात केली की आम्ही या हल्ल्यासाठी जबाबदार आहोत,” असं ते म्हणाले.
हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही
पहलगाम हल्ल्याबद्दल ते पुढे म्हणाले, “आम्ही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललो आहोत. पहलगाम हल्ल्याची बातमी मिळाली तेव्हा मी स्वत: तुर्कीच्या दौऱ्यावर होतो. आम्ही तेव्हाच स्पष्ट केलं होतं की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असं सांगितलं होतं. परंतु भारताने आमची मदत स्वीकारली नाही. 22 एप्रिलपासून दररोज आम्हाला हल्ला होणार असल्याची माहिती मिळत होती. परंतु आम्हाला चिथावणी दिल्यास आमचंही सैन्य चोवीस तास प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असेल.”