
वडूज : वडूज नगरपंचायतीच्या (Vaduj Nagar Panchayat) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देऊन वडूजकरांनी जाती-पातीच्या राजकारणाचे उच्चाटन केले आहे. या निमित्ताने वडूज शहरात विकासाचे नवे पर्व सुरु होणार आहे, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे (Banda Godse) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
प्रा. गोडसे म्हणाले, एका विशिष्ट धोरणाने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे पाच, वंचित बहुजन आघाडीचा एक व अपक्ष तीन नगरसेवक एकत्र आले होते. नऊ नगरसेवक एकत्र आले तरी हे काठारचे गणित होते. यापैकी एकाने जरी जहाजातून उडी घेतली असती तर संपूर्ण जहाज बुडाले असते. मात्र, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी प्रभावीपणे कॅप्टनशिप केली. तर दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आशिर्वाद असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस यशापर्यंत पोहोचली आहे.
निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस विरोधकांनी शेवटपर्यंत टोकाचे प्रयत्न केले. आमच्या गोटातील एक-दोन नगरसेवक फोडण्यासाठी सत्ता व लाखो, कोट्यावधी रुपयांचे अमिषे दाखविली गेली. त्याचबरोबर जाती-पातीचा मुद्दा उपस्थित करुन नगरसेवकांचा बुध्दीबेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच नगरसेवक व त्यांच्या पाठिराख्यांनी खंबीर भूमिका घेऊन विरोधकांना सत्तेत शिरकाव करण्याची संधी दिली नाही.
नगराध्यक्षपदासाठी मराठा बहुजन विशेषत: गोडसे समाजातील तीन उमेदवार असताना देखील धनगर समाजातील मनिषा काळे यांना नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदावरही ओबीसी प्रवर्गातील मनोज कुंभार यांना संधी देण्यात आली आहे. यापुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेवून आघाडी शासनाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जाण्याचा विचार केला होता, असा गौप्यस्फोटही यावेळी प्रा. गोडसे यांनी यावेळी केला. यावेळी कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे, हिंदुराव गोडसे, अशोकराव गोडसे, डॉ. महेश गुरव, विपुल गोडसे, पृथ्वीराज गोडसे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे, रविंद्र काळे आदिंसह नगरसेवक उपस्थित होते.