
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळेच प्रत्येक रत्नाचा प्रत्येक राशीवर वेगळा प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीने आपल्या राशीनुसार रत्न अर्थात खडा आपल्या बोटामध्ये घातला तर मेहनतीसह त्याला आरामात यश मिळतं. त्यामुळे आपणही कोणत्या राशीसाठी कोणतं रत्न शुभ आणि कोणतं रत्न अशुभ आहे हे जाणून घेऊया.
मेष
या राशीच्या लोकांच्या नाकावर खूप राग असतो. सांगण्याचा अर्थ असा की, मेष राशीचे लोक बरेच रागीट स्वभावाचे असतात. त्यामुळे या लोकांसाठी पोवळं हे रत्न अतिशय उपयुक्त आहे. मेष राशीचे लोक जिद्दी आणि रागीट स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांचा राग हे रत्न नियंत्रणात आणण्यास मदत करतं. या लोकांनीही चुकूनही हिरा घालू नये.
वृषभ
या राशीचे लोक खूपच चांगल्या स्वभावाचे असतात शिवाय ते अतिशय संवदेनशीलही असतात. यांच्या चांगुलपणाचा लोक खूपच फायदा उचलतात. तसंच हे लोक पटकन एखाद्याच्या सांगण्यामध्ये वाहून जातात. यातून वाचण्यासाठी या राशीच्या लोकांसाठी हिरा खूप शुभ असतो. कारण हिरा घातल्यामुळे लोकांची वाईट नजर आणि वाईट संगतीचा परिणाम या दोन्हीपासून बचाव होतो. हवं असल्यास, हिऱ्याच्या जागी ओपल हा खडाही घालू शकतात मात्र त्यांनी माणिक कधीही धारण करू नये.
मिथुन
या राशीच्या लोकांमध्ये अतिशय कमी संयम असतो आणि प्रत्येक कामाची घाई या लोकांना असते. यामुळेच या राशीच्या लोकांना पटकन यश मिळत नाही. त्यामुळेच या राशीच्या लोकांसाठी पाचू हे शुभ रत्न मानलं जातं. आयुष्यात यश मिळवण्यासाठी हे रत्न या राशीच्या लोकांना लाभदायी असतं. मात्र यांनी कधीही नीलम हे रत्न धारण करू नये, कारण हे रत्न त्यांंच्यासाठी अशुभ आहे.
[read_also content=”आहारात करा ‘या’ एका पदार्थाचे सेवन; मासिक पाळीचा त्रास होईल कमी https://www.navarashtra.com/latest-news/include-soyabean-in-the-diet-reduce-menstrual-cramps-nrng-98359.html”]
कर्क
या राशीचे लोक खूप मूडी स्वरूपाचे असतात. आपल्या जिद्दी स्वभावामुळे स्वतःच्या आयुष्याची स्वतःच वाट लाऊन घेतात. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी मोती हे रत्न शुभ आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या चुकीच्या भावनांना नियंत्रणात आणण्यासाठी या खड्याचा उपयोग होतो. तसंच या राशीच्या लोकांनी कधीही पोवळं हा खडा वापरू नयेत तो त्यांच्या राशीसाठी अशुभ मानला जातो.
सिंह
या राशीतील लोक दुहेरी आयुष्य जगत असतात. मनात एक आणि बाहेर एक अशी ही माणसं असतात. त्यामुळेच या लोकांवर फारच कमी लोक विश्वास ठेऊ शकतात. मात्र हेदेखील तितकंच खरं आहे की, यांचं आयुष्य संघर्षमय असतं. कितीही मेहनत केली तरी आपल्याला हवं असलेल्या ठिकाणी हक्क असूनही बऱ्याचदा पोहचू शकत नाहीत. याच कारणामुळे या राशीच्या लोकांसाठी माणिक आणि लाल ओपल ही दोन्ही रत्न शुभ मानली जातात. मात्र या राशीच्या लोकांसाठी हिरा अशुभ आहे आणि त्यांनी कधीही हिरा वापरू नये.
कन्या
पाहायला गेलं तर या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय कूल आणि शांत असं असतं. पहिल्याच भेटीत या राशीची लोकं सर्वांना आपलंसं करून घेतात. मात्र यांचा चंचल आणि खट्याळ स्वभावामुळे बऱ्याचदा लोकांना त्रासही होतो. आपल्या अपोझिट सेक्सला या राशीचे लोक पटकन आकर्षित करून घेतात आणि या राशीचे लोक बऱ्याचदा नकळत फसू शकतात. त्यामुळेच या राशीच्या लोकांनी पाचू रत्न घालणं चांगलं असतं. भविष्यामध्ये होणाऱ्या संकटांपासून हे रत्न त्यांचा बचाव करू शकतं. या लोकांनी माणिक अजिबात घालू नये.
तूळ
या राशीच्या लोकांना नेहमी नव्या गोष्टी हव्या असतात. त्यांना अजिबात जुन्या गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे नेहमीच हे लोक नव्या विचारांचं आणि आचारांचं स्वागत करण्यात पुढे असतात. मात्र या राशीचे लोक नेहमी दुसऱ्यांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांचा नकारात्मक प्रभाव बऱ्याचदा पडण्याची शक्यता असते. तो कमी करण्यासाठी हिरा वापरण्याची यांना गरज आहे. हिरा त्यांच्यासाठी भाग्यकारक आहे. मात्र यांनी कधीही पोवळं धारण करू नये.
वृश्चिक
या राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय मॅग्नेटिक स्वरुपाचं असतं. कोणालाही ते पटकन आपलंंसं करून घेतात. या राशीच्या लोकांमध्ये संयम आणि शांतता खूप जास्त प्रमाणात असते. मात्र एखादी गोष्ट मिळवण्यासाठी इतर लोकांना थोडीशी मेहनत करावी लागत असेल तर या राशीच्या लोकांना मात्र त्यासाठी अगदी घाम गाळावा लागतो. अर्थात अपार मेहनत करावी लागते. त्यामुळे या राशीच्या लोकांना पोवळं भाग्यकारक असून हिरा अजिबात चांगला नाही.
धनु
या राशीच्या लोकांचं मन नेहमीच तरूण असतं आणि त्यामुळे सतत काहीतरी नवं करण्यासाठी हे लोक उत्सुक असतात आणि नेहमी आपल्या मर्यादेबाहेर त्यांना काहीतरी करायचं असतं. ही रास शक्तीशाली राशींपैकी एक मानली जाते. मात्र बऱ्याचदा तिरस्काराचाही या लोकांना सामना करावा लागतो. या राशीच्या लोकांसाठी पुष्कराज हा खडा शुभ असून यांनी कधीही पाचू वापरू नये.
मकर
या राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराबरोबर वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करायला खूप मजा येत असते. आपल्या इच्छा आणि आकांक्षा काय आहेत हे सांगण्यासाठी कधीही हे लोक लाजत नाही. शिवाय हे लोक खूप मेहनती आणि काळजीवाहू असतात. मात्र यांना आपल्या कर्माचं फळ हे नेहमी उशीराच मिळतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नीलम खडा वापरावा आणि कधीही पुष्कराज खडा वापरू नये.
कुंभ
या राशीचे लोक प्रत्येक परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतात. कोणताही बदल त्यांना बेचैन करत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत कसं खुश राहायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असतं. मात्र या राशीच्या लोकांची तब्बेत बऱ्याचदा खराब असते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नीलम आणि पाचू या रत्नांचा वापर करावा. मात्र कधीही पुष्कराज खड्याचा वापर करू नये.
मीन
या राशीचे लोक आपल्या स्वभावामुळे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात असं म्हणायला हवं. तब्बेतीच्या बाबतीत नेहमीच हे लोक तक्रार करत असतात. बऱ्याचदा अनेक आजारांचा त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी पुष्कराज हा खडा वापरावा आणि त्यांच्यासाठी पाचू हा खडा अशुभ मानला जातो.