मुंबई: निर्माता आणि दिग्दर्शक संजयलीला भंसाली यांच्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपता संपत नाही आहे. अवघ्या काही दिवसांवर चित्रपट प्रदर्शित होणार असताना आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर बुधवारी तातडीने सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
आलिया भट्ट अभिनीत ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटातील दक्षिण मुंबईतील `कामाठीपुरा’ या परिसराचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी करत या परिसरातील ५५ स्थानिक रहिवाश्यांच्यावतीने श्रद्धा सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील दृश्यांवरून कामाठीपुरा परिसराची प्रतिष्ठा मलिन होत आहे. चित्रपटाने संपूर्ण परिसर रेड-लाइट हब म्हणून चित्रित करून त्या परिसराला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. येथील रहिवाशांची, विशेषतः महिलांची प्रतिमा मलीन होण्याची भीती आहे, त्यामुळे यातील कामाठिपुरा हा शब्द वगळावा आणि अन्य, तत्सम शब्द वापरावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर बुधवारी न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनीही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या परिसरातील अनेक सामाजिक संस्थाकडून या चित्रपटावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. तसेच कामाठीपुरा हा रेड-लाईट परिसर सांगण्यात आले असून गंगुबाई एक वैश्या आणि माफीया क्विन असल्याचे आणि संपूर्ण परिसर रेड-लाईट असल्याचे चित्रित करण्यात आल्यावर संस्थांनी आक्षेप घेतला असल्याचेही आमदारांचे म्हणणे आहे. त्यावरही बुधवारी मुख्य न्यायमूर्तीसमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. आलिया भट आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ येत्या २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.