राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालं. भाजपने 132 जागांवर विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, केंद्रातील भाजप सरकार हे घटकपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे, केंद्रातील सरकार स्थीर ठेवण्यासाठी मोदींना एनडीएमधील घटकपक्षांना सोबत घेऊन जावं लागणार आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्या चर्चांना अर्थ नसल्याचं स्वत: शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
देशात ज्या मोठ्या राजकीय उलथापालथ होणार आहेत, त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच, आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून त्यांची मोघलाई निती आहे. आपल्यापासून लांब चालला की कापून टाकायचं असं हे मुघलांचे बच्चे आहेत, असा टोला कडू यांनी भाजपला लगावला. राज्यात आलेलं सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे,असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला. योजनांमध्ये 4-5 टक्के भ्रष्टाचार होतच असतो, असे विधान माणिकराव कोकाटे यांनी केले होते.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना बच्चू कडू यांनी वेगळंच गणित मांडलं. जेव्हा मोठे नेते नाराज असतात, तेव्हा समजायचे की ते अतिशय खुश असतात आणि जेव्हा ते अतिशय खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावा कडू यांनी केला. राज्यातील दोन जिल्ह्यांतील पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये वाद पाहायला मिळथ आहे. पालकमंत्रीबाबत ज्या पद्धतीने वाद सुरू आहेत हे पाहता आता भाजप राज्यभर एकट्याचे पालकमंत्री बनवेल असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.