
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचा शिवजयंती दिनी ठिय्या
“बंद करा बंद करा, अवैध धंदे बंद करा”, “गावातील दारू बंद झालीच पाहिजे”, “चोऱ्यांना आळा बसलाच पाहिजे” अशा संतप्त घोषणांनी भोजदरी (पठार भाग) येथील ग्रामस्थांनी शिवजयंती दिनी (१९ फेब्रुवारी) ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
भोजदरी हे गाव संगमनेर तालुक्यातील दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असून, Pune-Nashik National Highway पासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. काही ठिकाणी शेततळ्यांमुळे टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळतो; मात्र अलीकडील चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; दडपशाहीचा आरोप, सभागृहातच खडाजंगी
चोरट्यांनी विहिरी, कूपनलिका आणि शेततळ्यांमधील केबल, कृषी पंप यांसारख्या साहित्यांची चोरी सुरू केली आहे. याशिवाय गावात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही Ghargaon Police Station कडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. उलट तक्रार नोंदविताना नागरिकांना त्रासदायक प्रश्न विचारले जात असल्याची तक्रारही करण्यात आली. त्यामुळे अनेक चोरीच्या घटनांची नोंदच केली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आंदोलनाबाबत पूर्वसूचना देऊनही प्रशासनातील एकही अधिकारी किंवा पोलिस प्रतिनिधी आंदोलनस्थळी न आल्याने संताप अधिकच वाढला. प्रशासन अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.
या ठिय्या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळेच चोरीचे प्रकार वाढत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. काही घरांत तर चोरट्यांनी स्वयंपाकघरातील भांडीसुद्धा चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी पोलिस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ कारवाई करून अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करावी, तसेच चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लवकरच घारगाव पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.