
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी माध्यम शाळांच्या अस्मितेला समर्थ आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने चित्रपटगृहांत ५० यशस्वी दिवस पूर्ण करत अर्धशतक गाठले आहे. या आनंददायी टप्प्याचे सेलिब्रेशन करताना चित्रपटाच्या टीमने शिवजयंतीही उत्साहात साजरी केली आणि सोहळ्याला दुहेरी जल्लोषाची रंगत चढली.
मुंबईतील एका चित्रपटगृहात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर सादरीकरण करण्यात आले. घोड्यावरून ‘बालशिवरायां’चे आगमन होताच प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. शिवगर्जना आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मराठी अस्मितेचा अभिमान आणि सांस्कृतिक उत्साह यांचा संगम अनुभवायला मिळाला. यावेळी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत विद्यार्थी आणि प्रेक्षकांसह हा खास क्षण साजरा केला.
The 50’ च्या विजेत्याचे नाव जाहीर? बिग बॉसच्या ‘या’ एक्स कंटेस्टंटने मारली बाजी
चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत बसून चित्रपट पाहण्याचा अनुभवही घेतला. प्रत्येक प्रभावी प्रसंगाला टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या आणि भावनिक प्रतिसाद मिळत होता. अनेक प्रेक्षकांनी आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या झाल्याचे सांगितले, तर तरुण पिढीनेही चित्रपटाशी मनापासून नाते जोडले. प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया ऐकण्याचा क्षण टीमसाठी अत्यंत भावनिक आणि समाधानकारक ठरला आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितले की, चित्रपटाचे ५० दिवस पूर्ण होणे आणि त्याच दिवशी शिवजयंती साजरी होणे हा खास योगायोग आहे. मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी असलेल्या या चित्रपटाचा आणि शिवरायांच्या प्रेरणादायी वारशाचा संगम अनुभवणे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळेच चित्रपटाचे शोज वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आठव्या आठवड्यात चित्रपटगृहांची संख्या शंभरच्या पुढे गेली असून, वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपटाची यशस्वी टप्पे कायम पाहायला मिळणार आहे.
मराठी यूट्यूबर JustNeelThings बाबा झाला हो; भावनिक व्हिडिओ शेअर करत दिली आनंदाची बातमी !
या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘चलचित्र मंडळी’ निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून निर्मितीची जबाबदारी क्षिती जोग यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.