माजी आमदार परशुराम उपरकरांचे घणाघाती आरोप
कणकवली/भगवान लोके: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे हा कुणातरी बीजेपीच्या माणसाकडे लपून बसला होता हे आता सिद्ध झालं आहे. कारण या प्रकरणात काल आलेले वकील हे
ठाण्यामधील भाजपाचे होते, तर दुसरे वकील हे राणे समर्थक राणेंचे कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा वकील सेलचे अध्यक्ष होते. आपटेला वाचवण्यासाठी भाजपा वकील देत आहे हे यातून स्पष्ट झाले आहे असे सांगत पुतळ्याचा विषय कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी त्यांना भाजपावर घणाघाती टीका केली. तर ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या ज्या भूमिका होत्या त्या संशयास्पद होत्या. काही पुढाऱ्यांनी तो पुतळा पाडला व दंगल घडवण्याचा काहीजण प्रयत्न करतात असं बोलून दाखवलं. तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यामुळे पुतळा पडला असं वक्तव्य केलं. माजी खासदारांनी वैभव नाईक यांनी तो पुतळा पाडला असावा अशी शंका घेत असे वक्तव्य केलं. परंतु हा पुतळा चुकीमुळे पडला त्यामुळे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.
काय आहे वकिलांचे स्टेटमेंट
वकिलांनी देखील पुतळा वाऱ्याने पडला हे तेच स्टेटमेंट केले आहे. मात्र तेथील स्थानिक म्हणतात की या वाऱ्याने आमचा एकही नारळ पडला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीदेखील याबाबत भाष्य केले असून या पुतळ्याला स्टीलचा वापर करायला पाहिजे होता असेदेखील मत त्यांनी मांडले आहे. या प्रकरणात एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मागील झालेल्या मोर्चात राणे भडकले आणि त्यांनी केलेली व्यक्तव्य ही बेताल असल्याचेही म्हटले आहे.
नितेश राणे गप्प का?
नितेश राणेंवर डागली तोफ
यावेळी परशुराम उपरकर यांनी नितेश राणेंवरही तोफ डागली. राज्यभरात सर्वत्र फिरत असणारे या मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे स्वतःला हिंदूंचे गब्बर समजतात. ते नितेश राणे हिंदूंचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर या प्रकरणावर का बोलू शकले नाहीत असा तिखट सवाल उपरकर यांनी उपस्थित केलाय. आप्पासाहेब पटवर्धनांचा पुतळा बनवल्यानंतर आमदार राणेंचे काही फोटो आपटे सोबत व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच जयदीप आपटे बद्दल आमदार नितेश राणे कुठेही बोलत नाहीत. त्यामुळेच ते जिल्ह्यातल्या प्रकरणावर लक्ष देत नाहीत. मात्र राज्यातल्या प्रकरणांवर बोलतात ही खरी या प्रकरणात शोकांतिका व यात खरी मेक आहे. असा टोलादेखील त्यांनी लगावलाय.
हे माफी कधी मागणार?
ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्या जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बोलायचं नाही मात्र राज्यभरातील विषयांवर बोलायचं या संपूर्ण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी माफी मागितली तरी जिल्ह्यातील स्थानिक भाजपचे लोक मात्र माफी मागत नाहीत. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री किंवा भाजपच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने व खासदार नारायण राणे यांनी देखील माफी मागितलेली नाही. याचाच अर्थ या सर्वामागे भारतीय जनता पक्ष आहे, असाही आरोप त्यांनी केला