ऐन विधानसभा निवडणुकीआधी राज्यात 'या' तिसऱ्या आघाडीची घोषणा; महायुतीसह ,'मविआ'ची डोकेदुखी वाढणार ?
कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे केली. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा करण्यात आली. २६ सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. तसेच महायुतीचे मधून बाहेर पडल्याचे ही त्यांनी सांगितले.
स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पुर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे. ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्या सुद्धा सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा सोबत येतील. मनोज जरागे यांनी पण एकत्रित यावे यसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चाही झाली आहे. आपण एक उद्दिष्ट घेऊन आपण लढू, ते आम्ही एकत्रित आलो तर आम्ही सगळे निवडून आणू शकतो, असे त्यांनी नमूद केले.”
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही, ‘परिवर्तन महाशक्ती’ चे नेतृत्व सामूहिक हे असणार आहे.” पुढे बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू बोलताना म्हणाले, ‘‘आमच्या जवळ विचारांचा व मुद्द्यांचा अजेंडा आहे. ज्या पक्षांना व संघटनांना आमच्या परिवर्तन महाशक्ती मध्ये सहभागी होयचे असेल त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे असतील.
महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगले काम करून दाखवतील असा विश्वास आहे.तसेच परिवर्तन महाशक्ती मध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.