
संगीतविश्वावर 8 दशके अधिराज्य गाजवणारा चिरतरुण आवाज हरपला; आशा भोसलेंच्या निधनानंतर सपकाळांची प्रतिक्रीया
मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांच्या निधनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या जादुई आवाजाने तब्बल ८ दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला असून, प्रत्येक वयातील व्यक्तीला आवडतील अशी गाणी त्यांनी गायली आहेत. आशाताईंच्या निधनाने जगाला भुरळ घालणारा चिरतरुण आवाज हरपला आहे, अशा शोकभावना सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
आशा भोसले यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लतादिदी व आशाताई या मंगेशकर कुटुंबातील दोन स्वररत्नांनी वर्षानुवर्षे रसिकांना आपल्या अविट गाण्याने मंत्रमुग्ध केले. संगीतक्षेत्रात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता पण यशाचे हे शिखर गाठण्यासाठी त्यांना लहानपणापासून खूप कष्ट करावे लागले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी लहान वयातच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती, त्यांनी आपल्या मेहनतीने संगीत क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले आहे. दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासह अनेक संगितकारांसोबत त्यांनी शेकडो अजरामर गाणी गायली. एक हजारांपेक्षा जास्त चित्रपटांसाठी, २० वेगवेगळ्या भाषांमध्ये आशाताईंनी गाणी गायली आहेत.
आशाताईंनी सर्व प्रकारच्या गाण्यांना आवाज दिला. सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून त्यांची गिनिज बुक मध्ये नोंद आहे. फिल्मफेअर, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषणसह अनेक मानाच्या पुरस्काराने आशाताईंना सन्मानित करण्यात आले आहे. आज आशाताई आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांचा चिरतरुण आवाज आणि त्यांनी गायलेली अजरामर गाणी यांच्या रुपाने त्या कायम आपल्या स्मरणात राहतील. आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना हा मोठा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.