
मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवांवर मोठी कारवाई; थेट कार्यमुक्तीच दिली
मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातच लिपिक राजेंद्र ढेरंगे याने ३५ हजारांची लाच स्वीकारली होती. या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. नरहरी झिरवाळ यांनी आता त्यांचे खासगी सचिव (पीएस) डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांच्या मूळ विभागात म्हणजे कृषि व पदुम विभाग, मंत्रालय येथे पाठवण्याचा निर्णय झिरवाळ यांनी घेतला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली होती. थेट मंत्रालयातील मंत्रिदालनातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर झिरवाळ चांगलेच अडचणीत आले. विरोधी पक्षांनी त्यांना लक्ष्य केले. पक्षाकडूनही त्यांना समज देण्यात आली. मात्र, नरहरी झिरवाळ यांनी आपला या प्रकरणाशी दूरान्वयेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. झिरवाळ यांनी स्वतः देखील या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आता त्यांचे पीएस रामदास गाडे यांनाच झिरवाळ यांनी पदावरून दूर केले आहे.
दरम्यान, डॉ. गाडे हे सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत असून, ते प्रतिनियुक्तीवर खाजगी सचिव या पदावर काम पाहत होते. १६ फेब्रुवारी २०२६ (म.पु.) पासून त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यावर्तित करण्यात आली आहे. या संदर्भातील आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करावेत, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांना पत्राद्वारे दिले आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक
नरहरी झिरवाळ वादाच्या भोवऱ्यात
नरहरी झिरवळ हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. मंत्रिमंडळातील त्यांच्या दालनामध्ये लाचखोरीचे प्रकरणावरील कारवाईमुळे झिरवळ यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये नरहरी झिरवळ सहभागी झाले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार या प्रकरणी त्यांची मतेही जाणून घेतल्याचे सांगण्यात आले आहे.