हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता काही जिल्ह्यात मुसळधार होताना दिसत आहे. त्यातच हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये पावसाने जोर धरला असून, त्या भागांत अद्यापही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे हिंगोली शहरातील सखल भागात पाणी साचले. जिल्हा प्रशासनातर्फे सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरु आहे.
हेदेखील वाचा : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
प्रादेशिक हवामान विभागाने गेल्या 24 तासांपासून हिंगोलीसह परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला असून, जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले ओढ्यांना पूर आला असून, शेतकरी, नागरिकांनी पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नदीकाठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मोठ्या धरणात पाण्याचा येवा असाच राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
शहरातील अनेक भागांत नागरिकांसाठी मदतकार्य
शहरातील सिद्धार्थनगर, इंदिरा नगर आणि कुशल नगरातील नागरिकांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकिय सेवा, रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या चमूसह तैनात ठेवण्यात आल्या आहेत. स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयात नागरिकांच्या सेवेत डॉक्टरांसह वैद्यकीय पथक, मुबलक औषधीसाठा, किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले आहे.
रस्त्यावरच पुराचे पाणी; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
शहरातील जीनमाता नगर, बांगर नगर, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, डिग्रस, कोंढूर येथेही पाऊस खानापूर ते ईसापूर अंधेरी रोडवर पुराचे पाणी आले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. सावरखेडा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 8 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
हेदेखील वाचा : गुजरातमध्ये पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू तर 17,800 जणांना सुरक्षितस्थळी हलवले