
फोटो सौजन्य - Social Media
यंदा हिवाळ्यानंतर काही काळ आकाशात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे काहींना चक्कर येणे, भोवळ येणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत. अशा परिस्थितीत अपघातांची शक्यताही वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर जावे आणि बाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा सनग्लासेसचा वापर करावा. तसेच हलके आणि सुती कपडे परिधान करावेत, जेणेकरून शरीरावर उष्णतेचा परिणाम कमी होईल.
आरोग्य तज्ज्ञांनी दररोज किमान २ ते २.५ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय शक्य असल्यास थंड वातावरणात राहणे, थेट सूर्यप्रकाश टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक आहे. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी लिंबूपाणी, ताक किंवा फळांचे रस यांसारखे द्रव पदार्थही घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी उन्हाच्या तडाख्यापासून स्वतःचे संरक्षण करावे, असेही आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.