
Fake Complaint Claim Raises Questions Over Alleged Paper Leak Controversy
MPSC Paper Leak: देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा केला आहे. ही ई-मेलद्वारे करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
२२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक भरतीची लेखी परीक्षा प्रक्रिया पार पडली. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर करण्यात आला. १ ते २१ जुलै या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.
मात्र, अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर २३ जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीत परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आणि गुणपत्रिका व अंतिम निवड यादीत विसंगती असल्याचाही दावा करण्यात आला होता.
तक्रार प्राप्त होताच एमपीएससीने तक्रारदाराला उपलब्ध पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्वांची चौकशी करण्यात येत असून, त्यांच्या जबाबांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाला एक महत्त्वाचे वळण मिळाले असून तक्रारदाराने आयोगाला आणखी एक ई-मेल पाठवत पूर्वी केलेली तक्रार बनावट असल्याचा दावा तक्रारदाराकडून करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये, लवकर पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून पेपरफुटीची बतावणी करून पुनर्परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचल्याचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २० मार्च रोजी कथित संभाषण झाल्याचा दावा असताना त्यासंदर्भातील तक्रार २४ जुलैपर्यंत विलंबाने का करण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.
यापूर्वी तक्रारदारांनी एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडे लेखी तक्रार करून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप केला होता. तसेच व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करून संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, आता तक्रारदारानेच आपली तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, या भरती प्रक्रियेवर याचा काय परिणाम होणार, याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.