
वीजदर कपातीवर शिक्कामोर्तब
पुणे : राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने जाहीर केला असून, २०३० पर्यंत दरवर्षी १ एप्रिलला वीजदर टप्प्याटप्प्याने कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीतील बहुवार्षिक वीजदर याचिकेला आयोगाने मंजुरी देत सर्व प्रवर्गातील ग्राहकांना दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
महावितरणच्या वीजदर प्रस्तावावर यापूर्वी विविध स्तरांवर कायदेशीर घडामोडी घडल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर आधीचा आदेश रद्द केला होता, तर सर्वोच्च न्यायालयानेही सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून नव्याने निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयोगाने जनसुनावण्या घेऊन आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करत अंतिम आदेश दिला असून, यामुळे वीजदरांबाबत २०३० पर्यंतची स्पष्टता निर्माण झाली आहे.
घरगुती ग्राहकांना अधिक दिलासा
१ एप्रिल २०२६ पासून आदेशाच्या दुसऱ्या वर्षाची अंमलबजावणी सुरू होत असून, वीजदरात आणखी कपात होणार आहे. महिना १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर ७.३१ रुपयांवरून ७.१० रुपये प्रति युनिट इतका कमी होणार आहे. पाच वर्षांत या वर्गासाठी सुमारे २६ टक्के कपात होणार आहे. १०० ते ३०० युनिट वापरासाठी दर १३.१७ रुपयांवरून १२.९४ रुपये होणार आहे. स्मार्ट मीटरधारक घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीत प्रति युनिट सवलत ८० पैशांवरून वाढवून ८५ पैसे करण्यात आली आहे.
उद्योग व व्यावसायिकांना ‘टीओडी’चा लाभ कायम
औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी ‘टाईम ऑफ डे’ (TOD) सवलत कायम ठेवण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान १५ टक्के, तर ऑक्टोबर ते मार्चदरम्यान २५ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून, पहिल्या पाळीत स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठी दर १०.७८ रुपयांवरून १०.७१ रुपये करण्यात आला आहे.
ई-वाहनांना प्रोत्साहन, सौरऊर्जेला संरक्षण
विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६-२७ साठी ९.५० रुपये प्रति युनिट दर निश्चित करण्यात आला असून, तो २०२८-२९ पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे ई-वाहन वापराला चालना मिळणार आहे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना चार्जिंग सुविधा उभारण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांच्या सवलती कायम ठेवण्यात आल्या असून, नव्या दररचनेत त्यांना कोणताही फटका बसणार नाही.
दरवर्षी घट; ग्राहकांना दिलासा कायम
या आदेशानुसार २०२९-३० पर्यंत दरवर्षी १ एप्रिलला वीजदर आणखी कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून उद्योग क्षेत्रापर्यंत सर्वांनाच दिलासा मिळणार असून, राज्याच्या अर्थचक्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.