कराड: ईव्हीएम बाबतची भूमिका नक्कीच संसयास्पद आहे. संख्याबळ १६० च्या पुढे कसे गेले, याचे भाजपच्या लोकांनाही आश्चर्य वाटत असेल. मध्यप्रदेशमध्ये कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नाही, हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि गुजरातची ईव्हीएम महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यात काहीतरी घोळ असून महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचे मताधिक्य जवळपास सारखेच कसे काय? अशा आमच्या अनेक प्रश्नांची निवडणूक आयोगाने समर्पक उत्तरे द्यावी, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सोमवारी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोहित पवार यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आ. पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा महायुतीला वाटतो तेवढा फायदा झाला नसावा. यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा. हाताला काम आणि पोटाला अन्न या व्यतिरिक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचाराच्या दिशा वळवली गेली. संतांच्या भूमीत भाजपने मोठ्या प्रमाणावर केलेल्या भेदभावालाही काही प्रमाणात यश आले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीत दोन्ही उमेदवार पाडण्याचे कारण ईव्हीएम, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्याची केलेली वातावरण निर्मिती, हेही असावे.
लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवतील
आ. पवार म्हणाले, २६ तारखेपर्यंत राज्यात सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु, लोकशाही आणि संविधान पाळणारे हे पक्ष नाहीत. ते मनमानी करतील. निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे. न्यायालयाची भूमिकाही काही निर्णयांबाबतीत संशयास्पद असल्याने न्यायालयात जाऊनही काही उपयोग नाही. त्यामुळे लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवून ते २६ तारीखही ओलांडतील, असे मतही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यासमोर व विचारांसमोर आपण नतमस्तक होऊन प्रेरणा घेतली आहे. पुढील पाच वर्ष जनतेच्या विकासासाठी व महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन आम्ही सर्वजण लढत राहणार आहोत. त्याला विधानसभा निकालानंतरच सुरुवात केली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ज्यांनी सुसंस्कृत राजकारणाची शिकवण दिली आणि ज्यांचे विचार कायमच महाराष्ट्राच्या भल्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतात त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा आज स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या कराड येथील स्मृतिस्थळी आदरणीय साहेबांसोबत भेट देऊन समाधीवर पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन… pic.twitter.com/dN2wi44ug2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 25, 2024
न्यायालयाकडून कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहित
पवार म्हणाले, ईव्हीएम संदर्भातील न्यायालयीन लढाईबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. विषय न्यायालयात गेल्यावर त्यांनी योग्य वेळेत निकाल देणे गरजेचे आहे. नाहीतर राष्ट्रवादी कोणाची? याबाबतच्या निकालाला तीन वर्षे कधी निघून गेली, हे कळलेही नाही. उशिरा दिलेले निकालही अन्यायच असतो, असे त्यांनी सांगितले. उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोकांवर विश्वास होता. परंतु, महाराष्ट्रात लागलेला निकाल हा लोकांनाही अपेक्षित नसणारा आहे. नेत्यांनी जरी तो स्वीकारला असला, तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तो स्वीकारणे अवघड आहे. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर यांना जवळपास सारखी मते मिळाली आहेत. पोस्टल मतांचा कौल वेगळा असून ईव्हीएमचा कौल फारच वेगळा आहे. आमच्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्यावर कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवायला लागले आहे.
सदरील व्हिडीओ धुळ्यातून एका कार्यकर्त्याने पाठवला.. संबंधित व्हिडीओत नागरिक देखील निकालामुळे अचंबित झाल्याचं पाहायला मिळते. एकंदरीतच निवडणूक आयोगाने राज्यभरातील जनतेला सध्याच्या परिस्थितीत ईव्हीएमबाबत काय खरं – काय खोटं हे सांगणं अपेक्षित असताना आयोगाकडून जनभावनेची कसलीही दखल… pic.twitter.com/XoLbZfYfRL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 25, 2024
एकहाती सत्ता हे भाजपचे मिशन
पहिले एक वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. तर नंतरचे चार वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील, असा अंदाज एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना पवार यांनी व्यक्त केला. तसेच २०२९ ला एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची रणनीती आहे. त्याला यावेळी काही प्रमाणात यश आले आहे. ते आत्ता १४४ ला कमी पडले. मनसेने बऱ्याच ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार पाडले. यामागे फडणवीस यांचे डोके होते. त्याचबरोबर सध्याचे समीकरण पाहता अजित पवार यांना दोन वर्षे मुख्यमंत्रीपद मिळेल, असे वाटत नाही. गेल्यावेळी त्यांना मिळालेली मंत्रिपदे यावेळी मिळाली तरी पुष्कळ झाले, असे त्यांनी सांगितले.