
फोटो सौजन्य सोशल मीडिया
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. कॅम्पस मध्ये वेळेत प्राथमिक वैद्यकीय उपचार मिळाले नाही परिणामी, त्याची प्रकृती खालावली व विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली हाेती. या पार्श्वभूमीवर कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेळेवर रुग्णवाहिका व आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अभाविपने केली आहे.
– कॅम्पसमध्ये २४×७ आपत्कालीन वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका, तसेच बॅकअप रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी.
– आपत्कालीन परिस्थितीसाठी स्पष्ट एसओपी व हेल्पलाइन व्यवस्था लागू करावी.
– बीएआरसी हॉस्पिटल किंवा जवळच्या सुपर-स्पेशालिटी रुग्णालयाशी एमओयू करून विद्यार्थ्यांना तातडीच्या उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
– प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य व अपघात विमा संरक्षण द्यावे.
– टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्थ सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक औषधे आणि आपत्कालीन उपकरणे उपलब्ध करून द्यावीत.
अभाविप मुंबईचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूने संपूर्ण विद्यार्थी समुदायाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्रशासनाने कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेचा गांभीर्याने आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत आणि योग्य रुग्णालयात तातडीने उपचार मिळणे ही मूलभूत आवश्यकता आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता या मागण्यांवर ठोस आणि कालबद्ध कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेच्या प्रश्नावर अभाविप मुंबई कोणतीही तडजोड करणार नाही. संबधित मागण्यांवर येत्या १० दिवसांच्या आत ठोस, दृश्यमान आणि समाधानकारक कार्यवाही करण्याची मागणी अभाविप मुंबईने केली आहे.