
आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने भातशेतीचे कंबरडे मोडले
रांजणी : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण आणि आहुपे या भातशेतीच्या भागात यंदा पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. भात लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक भात खाचरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. काही ठिकाणी लागवड केलेली भात रोपे पाण्याखाली गाडली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदाच्या भात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण ६३८०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यापैकी सुमारे ५१०० हेक्टर क्षेत्र आंबेगाव तालुक्यात भात लागवडीखाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळात शुभमुहूर्त मानून धुळवाफेत भाताची पेरणी केली. मात्र, रोहिणी व मृग नक्षत्रानंतर आद्रा नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने उर्वरित क्षेत्रावर लागवड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
‘हवा तेव्हा नाही, नको तेव्हा मुसळधार’
यंदा पेरणीच्या काळात पावसाने दिलेली हुलकावणी आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसला आहे. सुरुवातीला पावसाअभावी बियाण्यांची उगवण विरळ झाली, तर नंतरच्या मुसळधार पावसाने तयार झालेली रोपे आणि लागवड केलेले पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे ‘पाऊस हवा तेव्हा नाही आणि नको तेव्हा मुसळधार’ अशी अवस्था झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
भाताचे उत्पादन घटण्याची भीती
यंदा सुरुवातीला पाऊस वेळेवर न झाल्याने पेरणी केलेल्या भाताचे बियाणे विरळ उगवले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे रोपे तयार होण्यापूर्वीच नुकसान झाले. कसेबसे रोपे तयार करून भात लागवड केली; मात्र, आता पुन्हा जोरदार पावसामुळे भातखाचरांत पाणी साचून रोपे गाडली जात आहेत. यामुळे यंदा भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती आहे. शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, असे भात उत्पादक शेतकरी सिताराम कुडेकर म्हणाले.
महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी