
ऑनलाइन शंभर मित्र, पण ‘जिवलग’ किती? तरुणाईच्या नजरेतून डिजिटल मैत्रीचा नवा चेहरा
पुणे/गायत्री पवळे : फ्रेंड रिक्वेस्ट’पासून सुरू झालेली ओळख, ‘हाय-हॅलो’पासून वाढणाऱ्या गप्पा, रोजचे रील्स शेअर करणे आणि ग्रुप चॅटमध्ये तासन्तास रंगणाऱ्या चर्चा… आजच्या तरुणाईच्या मैत्रीची सुरुवात आणि प्रवास मोठ्या प्रमाणात डिजिटल झाला आहे. सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्समुळे मित्रांची संख्या वाढली असली, तरी या शंभर ऑनलाइन मित्रांमध्ये खरोखर ‘जिवलग’ किती, हा प्रश्न यंदाच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने चर्चेत आहे.
‘ऑनलाइन १०० मित्र, ऑफलाइन एकही जिवलग?’ ही संकल्पना आजच्या डिजिटल मैत्रीचे वास्तव मांडणारी ठरत आहे. सोशल मीडियावर शेकडो मित्र, फॉलोअर्स आणि ग्रुप्स असतात; मात्र मनातील गोष्ट सांगण्यासाठी किंवा अडचणीच्या वेळी प्रत्यक्ष धावून येणारे मित्र मोजकेच असतात. त्यामुळे ‘फ्रेंड लिस्ट’ मोठी असणे आणि मैत्री घट्ट असणे यात फरक असल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. याचबरोबर ‘ग्रीन डॉटची मैत्री’ ही संकल्पनाही डिजिटल नात्यांमध्ये रुजली आहे. मित्र ऑनलाइन असूनही मेसेजला उत्तर देत नाही, ‘सीन’ करून ठेवतो किंवा स्टेटस पाहूनही प्रतिक्रिया देत नाही, यावरून गैरसमज होण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच मैत्रीतील संवाद आता केवळ शब्दांपुरता न राहता ‘ऑनलाइन’, ‘सीन’, ‘टायपिंग’ अशा डिजिटल संकेतांवरही अवलंबून राहिला आहे.
दूर राहणारे मित्र राहतात संपर्कात
‘रील्समधली मैत्री, रिअल लाइफमध्ये किती खरी?’ हा आणखी एक प्रश्न तरुणाईसमोर आहे. समान आवडीचे रील्स, मीम्स किंवा पोस्ट शेअर करताना मैत्री सहज जुळते. समान छंद असणारे मित्र जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भेटतात. मात्र आभासी जगात प्रत्येकजण स्वतःची निवडक आणि आकर्षक प्रतिमा मांडत असल्याने प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व वेगळे असण्याची शक्यताही असते. याउलट डिजिटल माध्यमांचे फायदेही मोठे आहेत. दूर राहणारे मित्र व्हिडिओ कॉल, मेसेज आणि ग्रुप चॅटमधून सतत संपर्कात राहतात. नवीन मित्र, समान विचारांचे समूह आणि वेगवेगळ्या शहरांतील ओळखी सहज निर्माण होतात. मात्र बनावट प्रोफाइल, गोपनीयतेचा धोका, ऑनलाइन फसवणूक, सायबर छळ आणि सतत फोनमध्ये राहण्याची सवय ही त्याची दुसरी बाजू आहे. त्यामुळे ‘नो-फोन फ्रेंडशिप डे’ ही संकल्पना तरुणाईमध्ये चर्चेत येत आहे. एखाद्या दिवशी मित्रांनी मोबाईल बाजूला ठेवून प्रत्यक्ष भेटावे, मनमोकळ्या गप्पा माराव्यात, एकत्र फिरावे किंवा एखादी आठवण निर्माण करावी, असा यामागचा विचार आहे.
‘ऑफलाइन बॉण्डिंग’ही आवश्यक
दरम्यान, ‘एआय मित्र की खरा मित्र?’ हा नव्या पिढीसमोरील प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे. एआयशी गप्पा मारता येतात, विचार मांडता येतात; पण मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद, दुःख किंवा काळजी ओळखून प्रत्यक्ष साथ देण्याची जागा मानवी मैत्रीच घेऊ शकते. म्हणूनच तरुणाईच्या मते डिजिटल मैत्री नाकारण्याची गरज नाही; मात्र ‘ऑनलाइन कनेक्शन’सोबत ‘ऑफलाइन बॉण्डिंग’ही तितकेच आवश्यक आहे. स्क्रीनवर मित्रांची संख्या वाढवण्यापेक्षा स्क्रीनच्या पलीकडे नाते जपणे, हाच यंदाच्या फ्रेंडशिप डेचा खरा अर्थ ठरू शकतो.