Monsoon Red Alert:
Solapur, Dharashiv Red Alert: मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. मागील १५ दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, सोलापूरमधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. दाट ढगांमुळे वातावरणात बदल जाणवू लागला असून, मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जयवंत नगर परिसरात पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या भागातील जमीन पाच ते सहा फुटांपर्यंत खचून गेली असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांचे घरदार वाहून गेले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतशिवार आणि घरदाराचेही वाहून गेली आहे. अद्याप शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेली नाही.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडणाऱ्या चांदणी नदीवरील वाकडी गावातील पुलाचे कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले असूनही या पुलावरून नागरिकांची वाहतूक सुरूच आहे. अपघाताचा धोका कायम असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, “मोठा अपघात झाल्यावरच विभाग जागा होणार का?”असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश, देवीचा मिळेल आशीर्वाद
दरम्यान, सोलापुरात अल्पविरामानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत असून, पुराच्या पाण्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे. वाडकबाळ पुलावरील पाणी अद्याप ओसरलेले नसल्याने सोलापूर–विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंदच आहे. या ठिकाणी महामार्ग तळ्यासारखा दिसत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, त्यामुळे सीना नदीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. माढा, करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जनावरे आणि घरगुती साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देशही प्रशासनाकडून दिले जाणार आहेत.